किनवट : तालुक्यातील सव्वीस ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला केवळ एक दिवस उरला असताना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी २६ ग्रामपंचायतींचे १२६ अर्ज दाखल झाले आहेत. आजपर्यंत १६७ नामनिर्देशनपत्र दाखल झाले आहेत, अशी माहिती निवडणूक सूत्राने दिली आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या बऱ्याच इच्छुकांचे जातीचे प्रमाणपत्र आज सायंकाळी मिळाल्याने जातवैधता प्रमाणपत्रासाठी संचिका दाखल करणे शक्य नसल्याने तशा इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणार आहे. माहे एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपणाऱ्या तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींच्या ८२ प्रभागांच्या २२० जागांसाठी निवडणूक होत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर असताना आज अर्ज दाखल करण्याला एक दिवस बाकी असून २६ ग्रामपंचायतींचे १२६ नामनिर्देशनपत्रे दाखल झाली आहेत. आतापर्यंत १६७ नामनिर्देशन पत्रे दाखल झाली आहेत. आता बुधवारी शेवटचा दिवस असल्याने मोठे अर्ज दाखल होतील, असे काहीसे चित्र आहे.
किनवट तालुक्यातील २६ ग्रामपंचायतींसाठी चौथ्या दिवशी १२६ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:24 IST