जप्ती केवळ ५० किलोची : दोन्ही आरोपी कारागृहातनागपूर : अखेर कळमना भागातील १२ लाखांच्या तूर डाळीच्या अफरातफरीचे प्रकरण अधांतरीच राहिले. पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून केवळ तीन हजार रुपये किमतीची ५० किलो तूर डाळ जप्त केली. त्यानंतर तपासात ठोस प्रगती नसल्याने दोन्ही आरोपींची न्यायालयाच्या आदेशान्वये मध्यवर्ती कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. मंगलसिंग गुलाबसिंग राजपूत आणि पूरण माणिकलाल पटेल रा. हुलकी घाट जबलपूर, अशी आरोपींची नावे आहेत. त्यापैकी राजपूत हा ट्रकचालक तर पटेल हा ढाबामालक आहे. या प्रकरणाची माहिती अशी की, धान्य व्यापारी आनंदकुमार जैन यांनी कळमना पोलीस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल नोंदवला. या अहवालानुसार चिखली भागातील संमप्रीत फूड इंडस्ट्रिज आणि पूजा डाळ उद्योगाने ट्रकचालक राजपूत याच्यामार्फत एमपी-१७-एचएच ३१३४ क्रमांकाच्या ट्रकमधून ३२० पोती तूर डाळ २३ जून २०१४ रोजी कटनी येथील अनिल इंडस्ट्रिजकडे रवाना केली होती. परंतु ही डाळ संबंधित इंडस्ट्रिजकडे पोहोचलीच नाही. ही डाळ २१ टन होती आणि किंमत १२ लाख ७७ हजार रुपये होती. या प्रकरणी कळमना पोलिसांनी भादंविच्या ४०७, ४११, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी ट्रकचालक मंगलसिंग राजपूत याला ३० जून रोजी अटक करून, त्याचा तीनवेळा पोलीस कोठडी रिमांड प्राप्त केला होता. चौकशीत या ट्रकचालकाने बोलेरो वाहनातून आलेल्या दरोडेखोरांनी आपणास मारहाण करून डाळीसह ट्रक लुटून नेल्याचे सांगितले होते. त्याने ५० किलो वजनाच्या डाळीचे एक पोते हुलकी घाटातील पूरणलाल पटेल नावाच्या ढाबामालकास विकल्याचेही सांगितले होते. त्यामुळे पोलिसांनी ४ जुलै रोजी पूरण पटेल याला अटक करून ३ हजार रुपये किमतीची ५० किलो डाळ जप्त केली होती. उर्वरित डाळ आणि ट्रक अद्यापही बेपत्ता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या दोन्ही आरोपींची न्यायालयीन कोठडी रिमांडअंतर्गत कारागृहाकडे रवानगी करण्यात आली. (प्रतिनिधी)
तूर डाळीचा घोटाळा अधांतरीच
By admin | Updated: July 10, 2014 00:47 IST