राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन समारंभ : महेश पाटील यांचे प्रतिपादन नागपूर : आज उद्योगामध्ये तंत्रज्ञानाचा उपयोग काळाची गरज ठरली आहे. तंत्रज्ञानाशिवाय कोणत्याही उद्योगात प्रगती साध्य केली जाऊ शकत नाही. त्यामुळे तंत्रज्ञानाचा उपयोग अनिवार्य झाला आहे. यातून उद्योगाच्या प्रगतीसह पर्यावरण संरक्षणासह मदत होत असल्याचे प्रतिपादन कृषी तज्ज्ञ व गोवा येथील सेसा स्टरलाईट कंपनीचे उपाध्यक्ष महेश पाटील यांनी केले. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्यावतीने (नीरी) सोमवारी राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त एका खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. नीरीच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीरीचे संचालक डॉ. सतीश वटे होते. यावेळी महेश पाटील यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनच्या माध्यमातून मायनिंग उद्योगात नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग व त्यातून पर्यावरण संरक्षणाला होणारा फायदा, याविषयी सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, उद्योगात तंत्रज्ञानाच्या उपयोगाने वेळ व पैशाची बचत होते, तसेच उत्पादनाचा दर्जाही वाढतो. मायनिंगसंबंधी विचार केल्यास तंत्रज्ञानाच्या मदतीने जमिनीच्या पोटातील खनिजाचा शोध घेता येतो. शिवाय अत्याधुनिक मशीन्सच्या मदतीने कमी वेळात ते बाहेरही काढता येते. यासोबतच अलीकडेच वाहतुकीचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यातून खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. आतापर्यंत खनिज वाहतुकीची फार मोठी समस्या होती. अनेकदा खनिजाची चोरीही होत होती. परंतु आता कंपनीत बसून वाहतुकीवर नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे. शिवाय दुसर्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ओसाड जमिनीला हिरवेगार करता येऊ शकते. मायनिंग क्षेत्रात अशा तंत्रज्ञानाचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होऊ शकतो. उत्खनन करण्यात आलेल्या ठिकाणी अशी हिरवळ तयार करून पर्यावरण संरक्षणाचे काम करता येणे शक्य असल्याचेही ते म्हणाले. यावेळी नीरीचे संचालक डॉ. वटे यांच्या हस्ते पाटील यांना स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. (प्रतिनिधी)
तंत्रज्ञानाच्या मदतीने पर्यावरण संरक्षण!
By admin | Updated: May 13, 2014 00:57 IST