लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उद्योगांसाठी आता ई मार्केटिंग हे भारताचे भविष्य आहे. अॅमेझाॅन, अलिबाबा या कंपन्यांची ई मार्केटमुळे असलेली प्रचंड उलाढाल आणि यशस्वी अनुभव लक्षात घेता एमएसएमईंनीही ई मार्केटिंगकडे वळण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे सूक्ष्म, मध्यम व लघु उद्योगांच्या विकासासाठी शासकीय योजनांचे ‘डिजिटलायझेशन’ करणे गरजेचे आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. एमएसएमईच्या प्रगतीची किल्ली या कार्यक्रमात ऑनलाईन माध्यमातून ते बोलत होते.
शासकीय योजना डिजिटल केल्या तर त्यांची पारदर्शकपणे अंमलबजावणी करता येईल. उद्योग, व्यापार, व्यवसायासाठीदेखील डिजिटलायझेशन हे आवश्यक आहे. यामुळे मार्केटिंग अधिक प्रभावी होईल. मार्केटिंग, उत्पादन आणि शासकीय कार्यपद्धती डिजिटल असेल तर होणारे व्यवहार, कामे गतीने आणि पारदर्शकपणे होतील, असे गडकरी म्हणाले.