नागपूर : शेतकऱ्यांच्या हितासाठी कृषी उत्पादनात वाढ करण्याच्या उद्देशाने अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरण्यास कुणाचाच विरोध नाही. परंतु कृषी क्षेत्रात होणारे संशोधन हे स्वदेशी असावे. देशातील शास्त्रज्ञांच्या माध्यमातूनच ते विकसित करण्यावर अधिक भर दिला जावा, असा सूर देशभरातून आलेल्या विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केला. सध्या जगभारत नवनवीन तंत्रज्ञान वापरले जात आहेत. दररोज नवनवी यंत्रसामग्री येत आहे. भारतातही काही प्रमाणावर त्याचा वापर होतो आहे, परंतु या यंत्रसामग्रीचा वापर करावा किंवा नाही, यावर वाद सुरू आहेत. यावर चर्चा व्हावी, आणि यातून शेतकऱ्यांच्या हितासाठी काही ठोस मार्ग निघावा, या उद्देशाने रेशीमबाग मैदानावर आयोजित ‘अॅग्रोव्हिजन-२०१४’ मध्ये शुक्रवारी ‘आधुनिक यंत्रसामग्रीतून कृषी उत्पादन वाढ आणि पर्यावरणाचा संबंध’ या विषयावर देशातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात शेती व पर्यावरणावर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांचे खरंच हित होत असेल तर अत्याधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्री वापरण्याबाबत सर्वांनीच सहमती दर्शविली. परंतु आपल्याच देशातील संशोधकांनी संशोधन केल्यास ते येथील शेतकरी व एकूण परिस्थिती लक्षात घेऊन केले असेल. तसेच त्यातून खर्च कमी येईल. तेव्हा स्वदेशी संशोधनावर भर देण्यात यावा. यासाठी शासनाने संशोधनासाठी जास्तीतजास्त निधीची तरतूद करावी, असेही सांगण्यात आले. केंद्रीय वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत या चर्चासत्रात आयसीएआर (सिड्स)चे डेप्युटी डायरेक्टर जनरल डॉ. स्वरुप दत्ता, स्वदेशी जागरण मंचचे अश्विनी महाजन, नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसचे डायरेक्टर डॉ. के.सी. बंसल, भारतीय किसान संघाचे सचिव प्रभाकर केळकर, फाऊंडेशन फॉर बायोटेक्नोलॉजी अव्हर्नेस अॅण्ड एज्युकेशन प्रो. सी. कामेश्वर राव, विजन्ना भारतीचे जनरल सेक्रेटरी जयकुमार, पंजाब विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. आय.एस. दुआ, कॉटन इन्स्टिट्यूट आॅफ कॉटन रिसर्चचे संचालक डॉ. के.आर. क्रांती, भारतीय किसान समाजचे डॉ. क्रिष्णबीर चौधरी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे बायोटेक्नोलॉजी अॅण्ड बायोकेमेस्ट्री विभागाचे विभागप्रमुख डॉ. मानवेंद्र काचोरे, मायकोचे मॅनेजिंग डायरेक्टर राजेंद्र बारवाले, रासी सीडस् प्रा.लि.चे डॉ. अरविंद कपूर, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्यंकटेश्वरलू, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ न्यूट्रिशनचे डॉ. बी. दिनेशकुमार, महाराष्ट्र कृषी विभागाचे जॉर्इंट डायरेक्टर व्ही.एन. घवाते प्रामुख्याने सहभागी झाले होते. डॉ. सी.डी. मायी यांनी प्रास्ताविक सादर केले. बायोस्प्रेक्ट्रमचे ग्रुप एडिटर नारायणन सुरेश यांनी ओळख करून दिली. आयोजन समितीचे रवी बोरटकर यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
उत्पादन वाढीसाठी स्वदेशीवर भर
By admin | Updated: December 6, 2014 02:45 IST