नागपूर : शहरातील काही जुन्या आणि ऐतिहासिक शिक्षण संस्थांमध्ये विजयनगर, भरतवाडा येथील शाळेचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी हिरामण बावनकुळे यांनी १९६५ साली नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालय व उच्च प्राथमिक शाळेच्या लावलेल्या रोपट्याचे आज विशाल वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आज शाळेत केजीपासून दहावीपर्यंत १६०० विद्यार्थी अध्ययन करीत आहेत. महेंद्र एज्युकेशन सोसायटीद्वारे शाळेचे संचालन करण्यात येते. मराठी आणि सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण येथे उपलब्ध आहेत. भरतवाडासारख्या कामगारबहुल परिसरात असलेल्या या शाळेत ८० टक्के विद्यार्थ्यांचे पालक हे छत्तीसगडी कामगार आहेत. अशा विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात शिक्षकांनी कुठलीही कसर सोडली नाही. दहावीत १०० टक्के निकाल व गुणवत्ता यादीत विद्यार्थी आणून दाखविले आहे. दहावीच्या निकालाबरोबरच राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजनेत कित्येक वर्षापासून शाळेचा प्रथम क्रमांक येत आहे. शाळेने शिक्षणाच्या राबविलेल्या पॅटर्नमुळे एकाही विद्यार्थ्याला खासगी शिकवणी लावण्याची गरज भासत नाही. परीक्षेच्या माध्यमातून सातत्याने विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतवून ठेवले जाते. येथे खरोखरच विद्यार्थी घडत असल्याचा पालकांनाही विश्वास आहे. शिक्षणाबरोबर मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी दर शनिवारी परिपाठ, वक्तृत्व स्पर्धा, कथाकथन, गोष्ट सांगणे असे उपक्रम राबविले जातात. सर्व धर्माचे सण अतिशय उत्साहात साजरे करण्यात येतात. राष्ट्रीय हरित सेनेतर्फे पर्यावरण संवर्धनाचे कार्य परिसरात करण्यात येते. मुले परिसरात आरोग्यदूत म्हणून कार्य करतात. लक्ष वेधून घेणारी इमारत, आकर्षक आणि कलरफुल क्लासरूम, वाचनालय, आयसीटी कॉम्प्युटर लॅब, विज्ञानाच्या सुसज्ज प्रयोगशाळा, ई-लर्निंग आदी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले आहे.
यशस्वी वाटचालीची ५० वर्षे
By admin | Updated: July 16, 2016 02:59 IST