डॉ. पद्माकर पंडित
वैद्यकीय विद्यार्थ्यांची आत्महत्या हा तसा नवा विषय नाही. गेली अनेक वर्षे पदवीपूर्व व पदव्युत्तर वैद्यकांच्या आत्महत्येचे सत्र सुरू आहे. माझ्याच वर्गातल्या तीन मित्रांनी एमबीबीएस पूर्ण होण्यापूर्वीच स्वत: जीवनयात्रा संपवली. अगदी तरुण मित्रांच्या त्या आत्महत्या माझ्या मनाला चटका लावून गेल्या आणि त्यामुळेच की काय, मी (व नंतर माझी पत्नीदेखील) अशा विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात, सहकार्य करण्यात गढून गेलो. ज्यांना आयुष्याचा क्षणिक कंटाळा आला आहे, अशांना जर वेळेवर योग्य तो सल्ला, मार्गदर्शन, आधार मदत मिळाली, तर ते पुन्हा एकदा ठामपणे आयुष्यात उभे राहू शकतात, असा आमचा अनुभव आहे.
आत्महत्या करण्याचा विचार जेव्हा एखाद्याच्या मनात येतो, तेव्हा ती व्यक्ती भोवतालच्या परिस्थितीने अतिशय गांजलेली असते. अशी परिस्थिती कधी दीर्घकालीन असते, तर कधी अचानक उद्भवलेली व तात्पुरती. मात्र, दोन्हींबाबत आत्महत्या करणार्या व्यक्तीच्या मनात पराकोटीची असहायता निर्माण झालेली असते. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे ती व्यक्ती सैरभैर व हताश झालेली असते. आता प्राप्त परिस्थितीतून सुटण्याचा कोणताही मार्ग नाही; सर्वनाश अटळ आहे, अशी तिची खात्री (खरे तर भ्रामक समजूत) झालेली असते. माणसाची जगण्याची ओढ इतकी अनावर असते, की आत्महत्या खरे तर व्हायलाच नकोत. पण, त्या नाजूक कालावधीत ‘आता सारे काही संपले आहे, म्हणून सारे काही संपवलेच पाहिजे. हा त्रास या आयुष्यामुळे आहे, तेच संपले तर सर्व त्रास संपेल. आपण कायमचे सुटू- मुक्त होऊ’ ही चुकीची भावना त्या व्यक्तीच्या मनात इतकी प्रबळ, दृढ होते, की जगण्याच्या आसक्तीवरही ती मात करते!
विविध व्यक्तींची आत्महत्या करण्याची कारणे वेगवेगळी असली, तरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांना काही विशिष्ट कारणे जबाबदार असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. त्यातील वैद्यकांच्या बाबतचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे अभ्यास व परीक्षांचा ताण. खेरीज पदव्युत्तर वैद्यकांना अहर्निश कर्तव्ये, जबाबदार्या आणि (असल्यास) संशोधन-प्रबंध या आणखी दोन तणावांना तोंड द्यावे लागते. वैद्यक विद्यार्थी म्हणून चार अधिक चार (पदवीपूर्व व पदव्युत्तर) आणि शिक्षक- व्यावसायिक म्हणून तब्बल साडेचौतीस वर्षे काढल्यानंतर माझे असे मत झाले आहे, की वैद्यकक्षेत्र हे ‘घी देखा, लेकिन बडगा नहीं देखा’ असे आहे. वैद्यक व्यवसायाची चकाकती सोनेरी झालर पाहून आपण आयुष्यभर रोषणाईतील गणेशाप्रमाणे जगू, असे डॉक्टर होऊ इच्छिणार्यांना वाटत असते. काहीअंशी ते खरेही आहे; पण कुणासाठी? तर जो या शिक्षण-व्यवसायातील काटेकुटे, खाचखळगे समजून घेईल, त्याच्यासाठी, सर्वांसाठी नव्हे!
मी नेहमी गमतीने म्हणतो, की लहानपणी आपण एक तर चोर-शिपाई तरी खेळतो किंवा मग डॉक्टर-डॉक्टर! इतर कोणत्याही व्यवसायाबद्दल मुलामुलींना इतके आकर्षण नसते. दवाखाना, त्यावरील फलक, पांढराशुभ्र डगला, गळ्यातला उर:श्रवा (स्टेथोस्कोप), रंगीबेरंगी गोळ्या-औषधे, सुईचा धाक, रोज रोकड, समाजातील मान या व अशा अनेक भीतियुक्त आदर निर्माण करणार्या बाबींमुळे ते असते. पण, डॉक्टर होण्यासाठीचा प्रदीर्घ शिक्षणकाळ कुणालाच सोपा नसतो. अगदी बालपणापासून कधीच पहिला क्रमांक न सोडणार्यांचीही इथे पंचाईत होऊ शकते. मात्र, याची कल्पना बर्याच जणांना नसते. काहींना ती इथे आल्यावर येते. मात्र, ज्यांना इथल्या परिस्थितीशी जुळवून घेताच येत नाही, त्यांच्याबाबत क्वचित अशा दुर्दैवी घटना घडू शकतात.
व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या लढाईत बर्याचदा व्यक्ती जिंकते. कधी ती परिस्थितीला शरण जाते, कधी दुर्लक्ष करते, कधी सहन. काही जण जमेल तेवढी परिस्थिती अनुकूल करून घेण्याचा प्रयत्न करतात. काही जण हतबल झाले, पराभूत झाले, तरी टोकाचा विचार करीत नाहीत. खरे तर जगभर सर्वत्र माणसाला समजून घेणारी, त्याच्यावर माया करणारी, त्याच्या सुख-दु:खांत सहभागी होणारी संवेदनशील परिस्थिती असायला हवी.
प्रत्येक माणसाचा तो हक्क आहे; पण जगण्यातील औपचारिकता वाढत गेली, तशा चौकटी निर्माण होत गेल्या. वेगवेगळी वतरुळे तयार झाली आणि ती परस्परांना नको तिथेही छेदत गेली. सदासर्वदा आपल्याला हवे ते मिळेल, हवे तसे जगता येईल (विवेक व शुचितेचे भान राखून) याची शाश्वती कमी होत गेली. इथेच मानवी आकांक्षांचे, सुखाचे, दयनीय आकुंचन होत गेले. तो जीवनाच्या संक्रमणातील अपरिहार्यतेचा भाग आहे. मात्र, हे समजायला परिपक्वता यावी लागते.
याचा अर्थ, परिस्थिती बदलताच येणार नाही; बदलतच नाही, असा नाही. जिथे अनेकांना बर्याच अडचणी-भेडसावणारी यंत्रणा असेल तिचे क्रौर्य असह्य वाटत असेल, तर ती बदललीच पाहिजे. मात्र याला बराच वेळ, श्रम व खर्च लागतो. व्यक्तीने शक्य तेवढे परिस्थितीशी जुवळून घेणे जास्त सोपे असते. उदाहरणार्थ, वैद्यकासारख्या उच्चशिक्षणातील अभ्यास-ताण, इतके विषय, इतकी पुस्तके, इतक्या परीक्षा आणि त्यांचे अक्राळ स्वरूप पाहता छातीत कधी तरी धडधड, कधी तोंड कोरडे पडणे, कधी थरथर वगैरे व्हायलाच होते. विशेषत: बिगरशहरी, ना- इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना ते विशेषकरून होते. पण, मनोविकार आणि आत्महत्या वगैरे मात्र सर्वांमध्ये सारख्याच आढळून येतात. याचे कारण तीव्र स्पर्धात्मक वातावरण आणि स्वत:च्या क्षमतेपेक्षा जास्त महत्त्वाकांक्षा बाळगणे.
आणि आशाआकांक्षा केवळ विद्यार्थ्यांचाच नसतात; घरच्यांच्या तसेच समाजाच्याही असतात. काही वर्षांपूर्वी एका प्रथम वर्षाच्या हुशार विद्यार्थ्याने परीक्षेत उत्तीर्ण होऊनही आत्महत्या केली होती. कारण, त्याला ५६ टक्केच गुण मिळाले होते. त्या वेळी असा नियम आला होता, की पदव्युत्तर प्रवेशाकरिता सर्व वर्षांंचे, सर्व विषयांचे गुण धरले जाणार होते. आमच्याकडे तो आला नाही; त्यामुळे त्याची आत्महत्या आम्ही टाळू शकलो नाही, याची खंत आजही आहे. त्यावर मी आमच्या वार्षिकात ‘५६ टक्के’ शीर्षकाचा एक प्रदीर्घ लेख लिहिला होता; ज्याचा उपयुक्त परिणाम अनेक विद्यार्थ्यांवर काही वर्षे झाला. त्याचे आई-वडील लेख वाचून रडले आणि त्यांनी त्याच्या प्रती मराठीत तसेच इंग्रजी भाषांतर करूनही सर्वदूर वाटल्या. वैद्यकातील हे पदव्युत्तर वेड आजही कमी झालेले नाही. कदाचित होणार नाही, कारण ‘जेवढी टोकाची पदवी तेवढा मान व माल जास्त,’ असे समीकरण विद्यार्थ्यांंच्या डोक्यात असते.
सगळी पुस्तके खरेच पाठ करावी लागतात का? कोणाही तज्ज्ञाला विचारा, तो छातीठोकपणे सांगेल, की तो शिकला वा त्याला शिकवले त्यातले बरेचसे रोज लागत नाही; पण आमच्या प्रत्येक विषयतज्ज्ञाला वाटते, की माझा विषय फार महत्त्वाचा आणि तो संपूर्ण तपशिलात शिकवायला हवा.
माझे ठाम मत आहे (आणि माझ्याशी बहुतेक सर्व डॉक्टर सहमत होतील!), की उपयुक्त, फाफटपसारा नसलेला अभ्यासक्रम हवा. तेच पुस्तकांचे. शाळेसारखी प्रमाणित पाठय़पुस्तके नाहीत. पुस्तक लिहिणारा ग्रंथालयात बसून नक्कल काढतो. जे पुस्तक पदवीला, तेच नंतर! आणि काही जणांना एकाहून अधिक पुस्तके वापरायचा गोंधळात पाडणारा मोह. शिवाय, पुस्तके पाश्चात्त्य आणि परीक्षेत पूर्वेचे प्रश्न, असा खोडा आहे.
पदव्युत्तर विद्यार्थ्यांंवर रुग्णांचीही जबाबदारी असते. विशेषत: नव्याने रुजू होणार्यांवर. कायदे क्लिष्ट झाल्यामुळे मुलांची कारकुनी इतकी वाढली आहे, की विचारता सोय नाही. शिवाय, स्वत:च्या कामाखेरीज इतरही अनेक कामे त्यांना करावी लागतात. ४८ तास अपुरे पडतील इतके ओझे काहींच्या डोक्यावर असते आणि हा त्रास मुख्यत्वे होतो गुणवत्ताधारकांना. कारण, गुणवत्तेशिवाय इतर प्रकारे प्रवेश मिळणार्यांना निकालाची हमी आणि कामही कमी! तरुण, बुद्धिमान मुलांची ससेहोलपट करणारी ही परिस्थिती आहे. म्हणून आता बैजी महाविद्यालयात आम्ही अशी माहिती देणारे एक व्याख्यान प्रारंभी ठेवतो; तसेच पालक-शिक्षक-विद्यार्थी संघामार्फत विद्यार्थ्यांंना वैयक्तिक व संस्था स्तरावर मदत करतो. खरे तर सर्व देशभर एकच प्रवेश आणि पदवीनंतर चाळणी परीक्षा असली पाहिजे. काही प्रमाणात का होईना; पण हे जीवघेणे प्रकार हा सुप्त मनोविकारांचा परिणाम आहे. त्याबाबत नियमित कार्यवाही व्हायला हवी!
(लेखक बी. जे. महाविद्यालयात औषधशास्त्राचे प्राध्यापक आहेत.)