शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने कमान सांभाळली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
5
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
6
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
7
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
8
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
9
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
10
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
11
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
12
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
13
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
14
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
15
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
16
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
17
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान
18
विशेष लेख: उपराष्ट्रपतिपदाच्या खुर्चीत 'खेळात न उतरणारा खेळाडू'
19
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
20
Asia Cup 2025: कधी अन् कुठं पाहता येईल IND vs UAE मॅच? कसा आहे दोन्ही संघांमधील हेड-टू-हेड रेकॉर्ड?

‘कोसला’कारांचे चुकले तरी काय?

By admin | Updated: November 30, 2014 01:23 IST

अ.भा.म.सा.संमेलनाविषयी ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या अत्यंत जळजळीत प्रतिक्रियेपायी अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असाव्यात असे दिसते.

हेमंत कुलकर्णी - नाशिक
अ.भा.म.सा.संमेलनाविषयी ज्येष्ठ मराठी कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी व्यक्त केलेल्या अत्यंत जळजळीत प्रतिक्रियेपायी अनेकांच्या नाकाला मिरच्या झोंबल्या असाव्यात असे दिसते. आणि का झोंबू नयेत बरे? कुणी वरमावर बोट ठेवलं की तसं होणारच! 
प्रतिक्रिया किंवा तिच्यातील शब्द तसे नेहमीच व्यक्तिसापेक्ष असतात. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी मागल्या शतकाच्या नवव्या दशकात याच संमेलनांविषयी भाकीत वर्तवताना, एकविसाव्या शतकात अशी संमेलने अस्तंगत होतील असे म्हटले होते. लोकांच्या सद्सद्विचारांवरील श्रद्धा, दुसरं काय? पण याच प्रतिक्रियेच्या उत्तरार्धात ते म्हणाले की, एका साहित्य संमेलनाची जागा अनेक संमेलने घेतील आणि ती गावोगावी होतील. किती व्यापक होता तो विचार! काही रिकामटेकडय़ांना केवळ काही दिवसच रिकामपणाचा उद्योग मिळण्यापेक्षा अनेक रिकामटेकडय़ांना तो अनेक दिवस मिळत राहावा, हा विचार व्यापक नाही?
पण नेमाडे यांचा विचार असा व्यापक आणि म्हणून वरवरचा नाही. तो तळस्पर्शी म्हणावा लागेल. साधी गोष्ट. या संयुक्त महाराष्ट्रातील काही असंयुक्त साहित्य परिषदांमधील चार रिकामटेकडी डोकी एकत्र येतात. साहित्य संमेलनाचा ऊरुस आवंदा कुठं भरवायचा, याचा विचार करू लागतात. कारण दोन-चार आवतनं खिशातच असतात. यांनी बघायचं असतं ते इतकंच की या दोन-चार रिकामटेकडय़ांपैकी कोणापाशी बख्खळ पैका आहे आणि त्या पैशांच्या राशी तो रिकाम्या करायला एका पायावर तयार आहे! मग त्याच्यासाठी दौरा निघतो. त्या दोन्ही-चारी ठिकाणी हे रिकामटेकडे आपला वेळ, जे काही समोर येईल, द्रवरूप वा घनरूप, ते रिकामे करण्यात दवडू लागतात आणि थैल्या रिकाम्या करण्याची ऐपत कोणाची जास्ती, त्याला मनोमन वरून मोकळे होतात. 
मग रिकामा बसलेला कुणी कार्याध्यक्ष होतो कारण थैल्या रिकाम्या करायला राजी झालेला आपमतच स्वागताध्यक्ष झालेला असतो. त्यानंतर पुन्हा दोन-पाच वा पाच-दहारिकामटेकडे संमेलनाचा अध्यक्ष होण्यासाठी आपला रिकामा वेळ दवडत दवडत महाराष्ट्रभर हिंडू लागतात. मतदान होतं. कुणीतरी बाजी मारतं. त्याआधी काही रिकाम्या जीवांनी अध्यक्ष निवडला जावा का आवडला जावा यावर आपल्या रिकामपणाचा यथेच्छ वापर करीत काथ्याकूट करून मोकळे झालेले असतात. निवड जाहीर झाली रे झाली की मग अशाच काही रिकाम्यांना जोर चढतो. निवडणूक कशी लबाडीने पार पाडली गेली, हे सांगण्यासाठी मग ते आपले बोरू घासून शाईच्या बाटल्या रिकाम्या करू लागतात. पेपरवाल्यांनाही पेपरातील रिकाम्या जागा कशा भरायच्या हा प्रश्न असतोच की! तो अनायासेच सुटून जातो. 
संमेलनासाठी रिकामी जागा ठरली. रिकामे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, कार्याध्यक्ष ठरले, परिसंवादाचे पोकळ विषय ठरले, त्यात बडबडण्यासाठी रिकामे वक्ते ठरले की सारी सिद्धता झाली. मग लक्षात येतं, अरे हे साहित्य उर्फ ग्रंथ संमेलन, मग त्यात ते नको? ज्यांना ‘ग्रंथवाचन’ ही संज्ञा ज्ञात आहे त्यांचे डोळे लकाकून नकळत त्यांची जिव्हा त्यांच्याच ओष्ठकडांवर फिरून येते. मग कुणीतरी रिकामा जंतू ग्रंथाचा वेगळाही एक अर्थ आहे, हे सांगतो व ग्रंथदिंडी आणि ग्रंथ-विक्री यांची आठवण करून देतो. रिकामटेकडे प्रकाशक आणि ग्रंथविक्रेते पाचारण केले जातात आणि त्यांची दुकाने थाटण्याचा प्रबंधही केला जातो. 
प्रत्यक्ष उरूसाला प्रारंभ होतो. असंख्य हवशे नवशे गवशे आपले रिकामपण कारणी लावण्यासाठी भिरभिरत्या आणि आसुसलेल्या नजरेनं अनेक रिकामटेकडय़ांचा हा उद्योग बघत फिरू लागतात. फिरता फिरता ग्रंथ विक्रीच्या मंडपात येतात. एकेक ग्रंथ हाती घेतात, न्याहाळतात आणि भिरकावून देतात. आता 
आपलं रिकामपण संपत आलं याची जाणीव होताक्षणी तिथून काढता पाय घेऊ लागतात; पण जाताजाता एक मात्र म्हणून जातात, ‘काय रे हा रिकामटेकडय़ा लोकांचा उद्योग? कशासाठी इतकी भराभरा आणि बदाबदा पुस्तकं लिहितात, हजारो पानांच्या कादंब:या खरडतात, दुसरा काही कामधंदा नाही का? नसेल तर शोधा आणि करा ना तो. कशाला उगाच पुस्तकामागं पुस्तकं प्रसवण्याचा हा रिकामटेकडा उद्योग करीत राहता आणि आम्हाला मात्र नसता ताप करून ठेवता’? 
ता.क. नेमाडे सरांनी त्यांच्या भात्यातील एक बाण सा.सं.च्या दिशेने तर दुसरा विंग्रजी शाळांच्या दिशेने सोडला, हेदेखील बरेच झाले म्हणायचे. मराठी एके मराठी. अर्धवट काही नको. कारण या अर्धवटपणाचा फटका कोणा अन्याला नव्हेतर खुद्द नेमाडे सरांनाच काही वर्षापूर्वी बसला होता की. सरांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला तेव्हांचा किस्सा. एका विंग्रजी वृत्तसंस्थेतील अर्धवट भाषाज्ञान असलेल्या बातमीदाराने बातमी लिहिताना, ‘खोकलाकार भालचंद्र नेमाडे’ असा उल्लेख बातमीच्या सुरुवातीलाच केला आणि विंग्रजी वाचणारांसाठी अधिकचे स्पष्टीकरण म्हणून ‘खोकला’ या शब्दाच्या पुढे कंसात ‘कफ’ या शब्दाचीही योजना केली. जर हा बातमीदार लहान असतानाच विंग्रजीच्या शाळा मोडीत काढल्या गेल्या असत्या आणि मराठीतून मराठी भाषा शिकला असता, तर झाला असता असा घोटाळा?