तीन कोटींचे बुस्ट : हेक्टरी २० क्विंटल उत्पादनाचे टार्गेट
जीवन रामावत - नागपूर
मान्सूनची चाहूल लागताच खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. कृषी विभागासह शेतकर्यांनी पेरणीची तयारी सुरू केली आहे. गतवर्षी जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांना अतिवृष्टीचा चांगलाच फटका बसला. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकर्यांना थेट ‘सातबारा’वर बियाणे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील धान पिकाचा प्रथमच राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानात समावेश करून, यात धान उत्पादक शेतकर्यांना तीन कोटींच्या अनुदानाचे बुस्ट देण्यात आले आहे. जिल्ह्यात भाताचे सरासरी ७८ हजार ८०० हेक्टर क्षेत्र आहे. परंतु धान उत्पादकता केवळ प्रति हेक्टरी १५ क्विंटल एवढी आहे. त्यामुळे कृषी विभागाने ती उत्पादकता प्रति हेक्टरी २० क्विंटलपर्यंत वाढविण्याचे टार्गेट निश्चित केले आहे. या योजनेचा जिल्ह्यातील सुमारे साडेचार हजार शेतकर्यांना थेट लाभ मिळणार आहे. त्यांना प्रति हेक्टरी ७ हजार ५०० रुपयांचे अनुदान दिले जाणार असून, त्यात खते, बियाणे, कीटकनाशके १०० टक्के अनुदानावर वाटप केले जाणार आहे. यामध्ये जिल्ह्यात १०० हेक्टरचा एक प्रकल्प अशा एकूण १८ प्रकल्पांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी कामठी तालुक्यात-२, रामटेक-४, पारशिवनी-२, मौदा-४, उमरेड-२, कु ही-२ व भिवापूर येथे २ प्रकल्प राबविले जातील. या एका प्रकल्पासाठी ग्रामपंचायत स्तरावर सुमारे २५० धान उत्पादक शेतकर्यांची निवड केली जाणार आहे. यात धानाची उत्पादकता कमी असलेल्या गावांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये कृषी अधिकारी प्रात्यक्षिके सादर करून, शेतकर्यांना प्रशिक्षण देईल. यात अधिकाधिक धानाची लागवड ‘श्री’ पद्धतीने करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. यापूर्वी विदर्भातील गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चारच जिल्ह्यात ही योजना राबविण्यात येत होती. परंतु यंदा केंद्र सरकारने त्यात नागपूर जिल्ह्याचाही समावेश केला आहे. यात कृषी विभाग सुमारे ७ हजार ५०० क्विंटल धान बियाण्याचे शेतकर्यांना अनुदानावर वाटप करणार आहे.