निवडणुका झाल्या, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? काँग्रेस, ठाकरे बंधूंबाबत नाराजीचा सूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 08:13 IST2026-01-22T08:09:42+5:302026-01-22T08:13:18+5:30
Municipal Election 2026: उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही, असे म्हटले जात आहे.

निवडणुका झाल्या, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? काँग्रेस, ठाकरे बंधूंबाबत नाराजीचा सूर!
Municipal Election 2026: विधानसभा, नगर पालिका अन् आता महापालिकांमध्येही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला ब्रँड दिग्विजयी असल्याचे सिद्ध केले. भाजपाने जवळपास ९ महापालिकांमध्ये स्वबळावर सत्ता गाठली असून २९ पैकी २४ महापालिकांवर भाजपा-शिंदेसेना युतीने वर्चस्व सिद्ध केले आहे. नगरपालिका निवडणुकांप्रमाणेच महापालिकांमध्येही भाजप सर्वाधिक जागा मिळवत नंबर एकचा पक्ष ठरला असून जवळपास सर्वच ठिकाणी भाजपाच्या जागा मागील वेळेपेक्षा वाढल्या आहेत. उद्धवसेना, शरद पवार गटाचे अस्तित्वच राहिले नाही. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येऊनही मुंबईतील सत्ता राखू शकलेले नाहीत. हा दोन्ही ठाकरेंसाठी धक्का मानला जात आहे. यानंतर आता काँग्रेस, उद्धवसेना, मनसे यांनी कार्यकर्ते, पराभूत उमेदवारांकडे पाठ फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे म्हटले जाते आहे.
नवी मुंबई निवडणुकीत महापालिकेच्या पक्ष कोणताही असो, सतत २० वर्षे नवी मुंबईकरांनी गणेश नाईक यांच्यावर विश्वास दाखविला आहे. यावेळी तर १११ पैकी ६५ नगरसेवक निवडून एकहाती सत्ता सोपविली. यापूर्वी सत्तासोपानावर आरूढ होण्यासाठी नाईकांना इतरांच्या कुबड्यांची गरज भासत होती. कधी काँग्रेस तर कधी अपक्षांची मदत घेऊन आपणच नवी मुंबईचे दादा आहोत, हे त्यांनी सिद्ध केले आहे. या निवडणुकीच्या प्रचारात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईचे कसे नुकसान केले, हा मुद्दा त्यांनी प्रचारात मांडला. सत्ता पुन्हा हाती दिल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून आपण हे सर्व थांबवू, असे आश्वासन दिले. ते लोकांना भावले. आता एकहाती सत्ता आल्याने महापालिकाच नव्हे तर सिडकोसह एमआयडीसीत नाईक काय करतात याकडे शहरवासीयांचे लक्ष असेल. यातच पराभूत झालेल्या उमेदवारांकडे काँग्रेस, ठाकरे बंधूंनी सपशेल दुर्लक्ष केल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का?
नवी मुंबई महापालिका निवडणुकीत झालेला पराभव तुमचा एकट्याचा नसून, तो सर्वांचा असल्याचे सांगून त्यांचे पुनर्वसन करण्याची ग्वाही भाजपसह शिंदेसेनेने आपल्या पराभूत उमेदवारांना दिली. एवढेच नव्हे तर खा. नरेश म्हस्के यांनी शिंदेसेनेच्या सर्व पराभूतांच्या घरी भेट देऊन त्यांचे सांत्वन केले. भाजपकडून प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा पराभव झाला तरी पक्ष त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले. तसेच माजी खा. संजीव नाईक यांनी पराभूतांच्या भेटी घेऊन त्यांचा उत्साह वाढविला. मात्र, दुसरीकडे उद्धवसेना, मनसे, काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादीच्या श्रेष्ठींनी आपापल्या पक्षाच्या पराभूतांची साधी विचारपूस केली नाही. उद्धव ठाकरेंनी केवळ विजेत्यांनाच बोलावले. तर काँग्रेस, राष्ट्रवादीने ढुंकूनही पाहिले नाही. यामुळे कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? असा सूर उमटत आहे.
दरम्यान, नवी मुंबईत सर्वांना सोबत घेऊन चालणारे गणेश नाईकांचे राजकारणच चालते, इथे धनसंपत्ती वा बलप्रयोगाला थारा नाही, हे नवी मुंबईकरांनी पुन्हा एकदा दाखवून दिले आहे. गणेश नाईकांनी भाजपाच्या बळावर कधी नव्हे इतके निर्विवाद वर्चस्व मिळविले. नवी मुंबईतून गणेश नाईकांचा टांगा पलटी करूनच दाखवेल, या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या आव्हानानंतर पेटून उठलेल्या गणेश नाईकांनी शहर अक्षरशः पिंजून आपणच नवी मुंबईचे 'ठाणे'दार असल्याचे दाखवून दिले. निवडणूक प्रचारातही शिंदे-नाईक यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी सुरू असल्याने ही लढत प्रतिष्ठेची बनली होती.