नांदुरा : तालुक्यातील पातोंडा, पलसोडा व येरळी येथील पूर्णा नदीपात्रात जेसीबी मशिनचा वापर करुन हर्रास न झालेल्या रेती घाटातून रेतीची उचल व त्याच परिसरात रेतीचे मोठे साठे तयार करण्याचा गोरखधंदा रेतीमाफीयांनी सुरु केला आहे; मात्र तहसीलदार, तलाठी व मंडळ अधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे पातोंडा येथील उपसरपंच, ग्रा. पं. सदस्य व ग्रामस्थांनी केली आहे.
महसूल उपविभागीय अधिकारी सुभाष शिंदे यांच्या बदलीचे आदेश धडकताच तालुक्यातील रेतीमाफीयांनी अवैध रेतीचा उपसा व साठेबाजीचा गोरखधंदा जोमाने सुरु केला आहे. पूर्णा नदीपात्रातील पातोंडा, पलसोडा व येरळी या रेतीघाटांच्या रेतीसाठय़ांची हर्रासी झाली नाही. त्यातच नव्याने रुजू झालेले तहसीलदार खान, तलाठी अजय तायडे व मंडळ अधिकारी यांनी अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याने चक्क जेसीबी मशिन वापरुन नदीपात्रातून रेतीची उचल होत आहे. याबाबत तहसीलदार खान यांना वेळोवेळी याबाबतची माहिती संबंधित गावामधील सुज्ञ नागरिकांनी दिली; मात्र तहसीलची कोणतीही कारवाई संबंधित रेतीचोरांवर झाली नाही. त्यामुळे आज रोजी पूर्णा नदीपात्रात येरळी, पलसोडा व पातोंडा या शिवारात दहा ते पंधरा फुटाचे खड्डे करुन रेतीची वाहतूक होत आहे. याबाबत तहसीलदार यांनी कारवाई केली नसल्याने अखेर पातोंडा येथील उपसरपंच नारायण झालटे, ग्रा.पं. सदस्य श्रीकृष्ण झालटे, भागवत नेमाडे, सदस्या सुवर्णा झालटे व पंचफुला झालटे यांच्यासह गावातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे या रेतीचोरीची व तहसीलदार यांनी केलेल्या अर्थपूर्ण दुर्लक्षाची जिल्हाधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार करुन तत्काळ सर्व रेतीचोरांवर कारवाई करुन रेतीसाठे जप्त करण्याची मागणी केली आहे. सदर रेतीचोरांना तहसीलदार व तलाठी अजय तायडे यांनी असेच अभय दिले तर तहसीलसमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.