अकोला: देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत ३३ वनक्षेत्र असणे आवश्यक असले तरी राज्यात मात्र २0 टक्केच वनक्षेत्र आहे. राज्यात असलेल्या वनक्षेत्रात मराठवाडा, उर्वरित महाष्ट्राच्या तुलनेत विदर्भात निम्म्यापेक्षा जास्त वनक्षेत्र आहे. विदर्भात ५६ टक्के, तर मराठवाड्यात केवळ ५ टक्के वनक्षेत्र आहे. भरमसाट होत असलेल्या वृक्षतोडीमुळे तापमानात प्रचंड वाढ होत असून, पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. याचे भीषण परिणाम मानवाला भोगावे लागणार आहे. वृक्षतोडीमुळे दिवसेंदिवस जंगले कमी होत आहे. महाराष्ट्राचे एकूण क्षेत्रफळ ३,0७,७१३ चौरस किमी असून, एकूण वनक्षेत्र ६१,९३९ चौरस किमी आहे. हे प्रमाण केवळ २0 टक्के आहे. एकूण वनक्षेत्रापैकी झाडे, झुडपे असलेले वनाच्छादित क्षेत्र हे ५६,१८५ चौरस किमी असून, हे प्रमाण १८.२ टक्के आहे. तर केवळ गवत व मोकळे रान असलेले अवनीप्रत क्षेत्र ५,७५४ चौरस किमी आहे. यापैकी विदर्भात ५६ टक्के वन असून, मराठवड्यात पाच टक्के, तर उर्वरित महाराष्ट्रात ३९ टक्के वनक्षेत्र आहे. विदर्भात गडचिरोली, भंडारा व गोंदिया या जिल्हय़ांमध्येच वनक्षेत्र जास्त असून, अन्य जिल्हय़ांमध्ये कमी आहे. अकोला जिल्हय़ात केवळ ७ टक्केच वनक्षेत्र आहे. उद्योग, वाहनांद्वारे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड मोठय़ा प्रमाणात सोडण्यात येत आहे. हे प्रमाण वाढत असल्यामुळे तापमान वाढत आहे.वनक्षेत्र जास्त असले तर कार्बन डाय ऑक्साईड झाडे शोषून घेतात. परिणामी वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण कमी होते व संतुलन कायम राहते.
राज्यातील निम्मे वनक्षेत्र विदर्भात
By admin | Updated: July 23, 2014 00:55 IST