मुंबई : एक्स्प्रेस वे वरुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनावरील ताबा सुटून झालेल्या भीषण अपघातात चालकासह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला.ही धडक इतकी जोरदार होती की वाहनाचे अक्षरश: दोन तुकडे झाले होते. दुसऱ्या घटनेत वर्धा जिल्ह्णातील हिंगणघाटमध्ये रिक्षा उलटून दोन शेतमजूर महिलांचा, तर तिसऱ्या अपघातात राजापूर गंगेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला वेरळ घाटात कंटेनरने दिलेल्या धडकेत मायलेकांचा जागीच मृत्यू झाला़ या घटना गुरुवारी घडल्या़ वर्धा जिल्ह्णातील हिंगणघाटमध्ये महिलांना मजुरीसाठी शेतात घेऊन जाणाऱ्या रिक्षाचालकाचे मागून ट्रक येत असल्याचे लक्षात येताच नियंत्रण सुटले आणि रिक्षा उलटला. या अपघातात दोन ठार तर ११ महिला जखमी झाल्या. सुनंदा संतोष म्हैसकर (४९), विमल पिंपळशेंडे (६५) अशी मृतांची नावे आहेत़ दरम्यान, सहा महिलांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्याच्या तयारीत असताना संतप्त जमावाने दोन रुग्णवाहिकांवर दगडफेक करुन काचा फोडल्या. यानंतर सर्वच जखमींना सेवाग्राम रुग्णालयात हलविण्यात आले. तर रत्नागिरीत जिल्ह्णातील राजापूर गंगेच्या दर्शनासाठी गुहागर पालशेतहून निघालेल्या भाविकांच्या वाहनाला कंटेनरने दिलेल्या धडकेत माय-लेकांचा जागीच मृत्यू झाला़ आशा प्रमोद अडूरकर, दुर्वास अडूरकर अशी मृत मायलेकांची नावे आहेत़ तसेच पाचजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ रत्नागिरीत हलविण्यात आले आहे़ हा अपघात वेरळ घाटामध्ये गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास घडला. अपघातानंतर कंटेनर चालक किसनसिंग लालसिंग (४०) हा पळून गेला होता. त्याला वेरळ ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. कंटेनर काढण्यासाठी आलेल्या क्रेनमुळे महामार्गावरील वाहतूक अर्धा तास बंद करण्यात आली होती.
राज्यात तीन अपघातांत ९ ठार
By admin | Updated: August 1, 2014 04:18 IST