बांबवडे : बांबवडे (ता. शाहुवाडी) येथे भरणाऱ्या आठवडा बाजाराच्या नियोजनाच्या अभावामुळे कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते. भाजी मंडईची जागा बदलली असली तरी, पिशवी रोड व सरुड रोड येथील लहान-मोठ्या स्टॉलधारकांच्या वाहन पार्किंगच्या अस्ताव्यस्तपणामुळे, लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतो.
शाहुवाडी तालुक्यातील बांबवडे ही महत्त्वाची बाजारपेठ आहे. बाजारपेठेच्या मध्यातून कोल्हापूर - रत्नागिरी हा महामार्ग गेल्यामुळे आठवडा बाजारात वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न तयार होतो. तसेच बाजाराचे योग्य नियोजन नसल्यामुळे ही समस्या गंभीर बनली आहे.
बसस्थानक परिसरातील अस्ताव्यस्त वाहतूक व काही स्टॉलधारक बिगर नियोजनाचे बसलेले असतात. बसस्थानक परिसरातील जागा अपुरी असल्याने येणाऱ्या-जाणाऱ्या बसेस रस्त्यावरच थांबतात. एकाचवेळी दोन्ही बाजूला बस थांबल्यानंतर इतर मोठी वाहने जाण्यास जागाच राहत नाही. बाजारात खरेदीसाठी इतर वाहनेही उभी असतात आणि वाहतुकीची कोंडी होते.
वाहतुकीची कोंडी करणारे चौक बस स्थानक परिसरातील चौकातून जाणारा पिशवी रोड हा वाहतूक कोंडीचे कारण ठरतो. हा रस्ता अरुंद असल्याने बाजारादिवशी दोन्ही बाजूला ठेले लागलेले असतात. त्यामुळे एकेरी वाहतूक होईल एवढा रस्ता असतो. ही परिस्थिती मुख्य चौक ते शिराळकर हॉटेलपर्यंत असते. सरुड रोड येथेही अरुंद रस्ता असल्याने रस्त्याच्या बाजूला एखादे जरी वाहन उभे असले तरी, वाहतुकीची कोंडी होते आणि सरूड रोड व पिशवी रोड येथील अस्ताव्यस्तपणाचा परिणाम मुख्य रस्त्यावर होतो.
वाहन पार्किंगची गचाळ व्यवस्था ही मोठी समस्या आहे. कोणीही येते आणि जागा दिसेल त्या ठिकाणी वाहन उभे करते. यामध्ये दुचाकींचे प्रमाण जास्त असते. रस्त्याच्या दुतर्फा दुचाकींचे अस्ताव्यस्त पार्किंग असते आणि अशातच बाजारात भाजीपाला खरेदीसाठी जाणारे वाहनधारक येथेच वाहने उभी करून जातात. त्यांना वाहने उभी करण्यासाठी जागाच नाही. या चौकात खासगी प्रवासी वाहतूक करणारी वाहने परिसरात उभी असतात. त्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत भर पडते.
पार्किंगची व्यवस्था
आठवडा बाजारदिवशी पार्किंगची व्यवस्था बस स्थानक परिसरात न करता जनावरांचा बाजार भरत असलेल्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात केल्यास रस्त्यावर लागणाऱ्या वाहनांची संख्या कमी होईल. खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांनी बाजारादिवशी प्रवासी भरण्याची व्यवस्था आंबिरा फुलाच्या पूर्वेस, बोरगे मशीन, सरुड रोडवरील पेट्रोल पंप आदी ठिकाणी करणे गरजेचे आहे.
किरकोळ विक्रेत्यांची पर्यायी व्यवस्था
पूर्वी भाजी मंडई चौकातच भरत होती. आता ती नवीन बांधलेल्या भाजी मंडईमध्ये भरत आहे? त्या भाजी मंडईच्या बाजूलाच सर्व प्रकारच्या सर्व किरकोळ विक्रेत्यांची व्यवस्था केल्यास बसस्थानक परिसर मोकळा श्वास घेईल.
ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व महामार्ग व्यवस्थापन यांनी समन्वय राखून बाजारपेठेच्या व्यवस्थेसह वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न निकालात काढण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
फोटो :
बांबवडे येथे आठवडा बाजारादिवशी गजबजलेला बस स्थानक परिसर व पिशवी रस्त्यावर झालेली वाहतुकीची कोंडी.