विविध क्षेत्रांतील बदलत्या तंत्रज्ञानाचा वेध घेत आपण नव्या वर्षात पदार्पण केले आहे. अनेक बऱ्या-वाईट आठवणी, घटनांचा दस्तऐवज बनलेल्या वर्षांची कालगणना कशी सुरू झाली. त्याच्या विविध पद्धती, वर्षागणिक बदललेले तापमान, त्याची कारणे आणि भविष्यातील धोके टाळण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबाबत शिवाजी विद्यापीठाच्या भूगोल अधिविभागातील सहयोगी प्राध्यापक डॉ. एस. डी. शिंदे यांच्याशी साधलेला हा थेट संवाद...प्रश्न : कालगणनेचा उद्देश, प्रकार कोणते आहेत?उत्तर : कालगणना म्हणजे कालाचे मापन करण्याची पद्धत आहे. ते एक शास्त्र आहे. घडत असलेल्या आणि घडलेल्या घटनांचा कालानुक्रम सांगणे हा त्याचा उद्देश आहे. कालगणनेच्या पद्धती प्रदेशानुसार वेगवेगळ्या आहेत. त्यात चिनी, इजिप्तमधील, बॅबिलोनिया व अॅसिरिया, ज्यू, ग्रीक, रोमन, मध्य अमेरिका, भारतीय आणि ख्रिस्ती अशा नऊ पद्धतींचा समावेश आहे. त्यातील ख्रिस्ती कालगणनेला आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्व आहे. त्यात काही लोक रोम शहराच्या उभारणीपासून म्हणजे १ जानेवारी ७५४ ए. यू. सी. पासून करतात, तर काही येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून म्हणजे इ. स. पू. २५ डिसेंबरपासून करतात. जगातील बहुतांश देशांत ही कालगणना प्रचलित असून, तिचा सर्वसामान्यपणे वापर केला जातो.प्रश्न : भारतीय कालगणना कशी आहे?उत्तर : वैदिक काळात अहोरात्र पक्ष, चांद्रमास, ऋतू, नक्षत्रे यांचा आपल्या पूर्वजांना चांगले ज्ञान होते. आपल्या देशात चंद्राच्या अनुषंगाने होणारे १२ चांद्र महिन्यांचे चांद्र वर्ष आणि सूर्य व तारे यांच्या अनुषंगाने होणारे सौरवर्ष, तसेच त्यांचा मेळ घालण्यासाठी धरावा लागणारा अधिक मास अशा पद्धतीने आपण इतर देशांच्या पुढे होतो. २७ नक्षत्रांपासून तयार केलेल्या १२ राशी, सूर्यादी सप्तग्रहांवरून बनविलेले वार हे आपल्या देशातील आर्यांनी ग्रीक लोकांपासून घेतले आहे. आपल्या देशात विविध कालगणनेच्या पद्धती आहेत. देशात ज्या विविध जमाती येऊन गेल्याने त्यांची निर्मिती झाली आहे. प्रादेशिक भिन्नता, तसेच पराक्रमी राजे स्वतंत्र कालगणना प्रचलित करत होते.प्रश्न : भारतीय कालगणनेचे प्रकार कोणते?उत्तर : आपल्या देशात सुमारे अडीच हजार वर्षांत साधारणत: २५ कालगणना उत्पन्न झाल्या आहेत. यात अमली-कटकी, इलाही, कटकी-अमली, कलचुरी, कलियुग, कोल्लम, गांगेय, गुप्त, ग्रहपरिवृत्ती, चालुक्य विक्रम, जव्हार, जुलूस, नेवार (नेपाळ), पर्गनीती, पुदुवैप्पु, तुर्की द्वादशवर्षचक्र व चिनी षष्टिवर्षचक्र, फसली, बंगाली-अमली, बार्हस्पत्य वर्षचक्र एक व दोन, बुद्धनिर्वाण, भाटिक, मगी, मब्लुदी, मौर्य, राज्याभिषेक, लक्ष्मणसेन, विक्रम, विलायती-अमली, वीरनिर्वाण, शक, शुहूर सप्तर्षी, सिंह, सिल्युसिडी, हर्ष, हिजरी यांचा समावेश आहे. त्यातील काही शुद्ध भारतीय, काही परकीय आणि काही मिश्र स्वरूपाच्या आहेत. चांद्र व सौर वर्षांचा मेळ घालण्यासाठी अधिकमासाची तरतूद केली होती. त्याला अधि, अधिक, प्रथम, मल अथवा ‘धोंडा मास’ म्हटले जाते. मुस्लिम समाजाकडून हिजरी कालगणनेचा वापर केला जातो. ही कालगणना शुद्ध चांद्रमासाची आहे. मात्र, त्यानुसार व्यवहार त्रासदायक ठरू लागल्याने सौरकालगणनेचा वापर केला. हिंदू पद्धतीत महिन्याचे दिवस मोजण्यासाठी प्रथम त्याचे सारखे भाग किंवा पक्ष करून त्यांना अनुक्रमे शुद्ध, शुक्ल किंवा सीत आणि वद्य, कृष्ण अशी नावे देण्यात आली.प्रश्न : कालगणनेप्रमाणेच जागतिक तापमान बदलाची सध्या स्थिती कशी आहे?उत्तर : ख्रिस्ती कालगणनेनुसारच अधिक प्रमाणात कामकाज चालते. काही समाज पूर्वापार चालत असलेल्या कालगणना पद्धतीनुसार विधी, उत्सव साजरे करतात. जागतिक तापमान बदल वेगाने होत आहे. गेल्या १५० वर्षांचा अभ्यास काही तज्ज्ञांनी केला आहे. त्यातून पृथ्वीच्या पृष्ठभागाचे तापमान कधीच स्थिर नसल्याचे वास्तव समोर आले आहे. आपण सध्या हिमयुगात असल्याचे मानले जाते. तापमानवाढ, बदलला सूर्य व पृथ्वीतील कमी-अधिक होणारे अंतर कारणीभूत असून ती एक नैसर्गिक क्रिया असल्याचे म्हणणारा एक विचारप्रवाह आहे. कार्बनचे वाढलेले उत्सर्जन, जंगलतोड, प्रदूषण अशी मानवनिर्मित कारणे अधिक जबाबदार असल्याचे दुसऱ्या प्रवाहाकडून सांगितले. गेल्या २० वर्षांतील तापमानवाढीवर नजर टाकली असता त्याचे धगधगते वास्तव जाणविते. त्यात १९९०, ९५, ९७,९९, २०००, २००१, ०२, ०३, ०४, ०५, २००६ ही वर्षे उष्णवर्ष म्हणून नोंद झाली आहेत. त्यात जून २००३ मध्ये आंध्र प्रदेशमध्ये ५० अंश सेल्सिअस, तर मे २००६ मध्ये मुल्तानमध्ये (पाकिस्तान) ५१.४७ अंश सेल्सिअस अशा सर्वाधिक तापमानाची नोंद झाली होती. तापमानवाढीमुळे हिमनग वितळत असून, त्याचा परिणाम समुद्राच्या पाणी पातळीत वाढ होत आहे, ते धोकादायक ठरणारे आहे.प्रश्न : तापमान बदलाचा काय परिणाम होत आहे?उत्तर : हिमालय परिसंस्था धोक्यात आली आहे. समुद्राची पाणी पातळी उंचावत आहे. गेल्या २० वर्षांत हवामानाच्या संबंधित त्सुनामी, पूर, वादळ अशा आपत्तीत दुपटीने वाढ झाली आहे. ७० च्या दशकात जगात वर्षाला आठच्या आसपास होणाऱ्या वादळांची संख्या २००४ पासून १८ पर्यंत पोहोचली आहे. भूस्खलन, पूर अशा आपत्तींमुळे एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे पुराची स्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्याची टंचाई, अन्नधान्याची उत्पादकता कमी होत आहे. पूर, दुष्काळाच्या परिस्थितीतील आजार वाढत आहेत.प्रश्न : तापमानवाढ रोखण्यासाठी काय करायला हवे?उत्तर : पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. पाण्याचा पुनर्रवापर करण्यात आपल्या देशाचा जगात दहावा क्रमांक आहे. सौर, बायोगॅस, पवनऊर्जा वापरावी. सीएफएल बल्ब वापरावेत. वृक्षारोपणावर भर द्यायला हवा. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिक वापर करावा. रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करण्यात यावे. तापमान संतुलित राखणे सर्वांसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. त्यामुळे छोट्या-छोट्या कृतींमधून पर्यावरण समृद्धीचे प्रत्येक पाऊल टाकणे गरजेचे आहे. त्या अनुषंगाने नवीन वर्षात त्याची सुरुवात करणे अधिक चांगले ठरणारे आहे. - संतोष मिठारी
पर्यावरण समृद्धीचे पाऊल हवे
By admin | Updated: January 1, 2015 00:13 IST