सेनापती कापशी)
महाविकास आघाडी सरकार शेतकरी व सर्वसामान्य जनतेला दिलेले शब्द पाळता येत नसल्यामुळे अपयशी ठरले आहे. दिलेली आश्वासने न पाळता शेतकऱ्यांची दिशाभूल हे सरकार करीत आहे. हे त्यांचे अपयश लपविण्यासाठी शेतकऱ्यांच्या फायद्याचे असलेल्या केंद्राच्या कृषी विधेयकावर ते टीका-टिप्पणी करीत आहेत, असा घणाघाती आरोप शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केला.
आलाबाद (ता. कागल) येथील इनामदार मळ्यात चिकोत्रा खोऱ्यातील शेतकऱ्यांशी शिवार संवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
सरकारमधील जबाबदार मंत्री आश्वासन देतात तरीही शेतकरी व सर्वसामान्यांना दिलेला शब्द पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष करण्याचा सरकारचा डाव आहे. मात्र, शेतकरी व सर्वसामान्यांना त्यांच्या हक्काची पै-आणि पै मिळवून देण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी त्यांच्यासोबत लढत राहणार आहे. असा विश्वासही घाटगे यांनी शेतकऱ्यांना यावेळी दिला.
किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भगवान काटे म्हणाले, राज्य सरकारमधील मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी वेळच नाही. समरजित घाटगे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत. त्यांच्या या शेतकरी संवाद कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
यावेळी जलयुक्त शिवार समितीचे अध्यक्ष उमेश देसाई, मनसेचे तालुकाध्यक्ष आनंदराव गुरव, भिकाजी तिप्पे, सागर मोहिते, दिलीप तिप्पे यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमास राजे बँकेचे चेअरमन एम. पी. पाटील, शाहू साखरेच्या माजी संचालिका बेबी करडे, महिला भाजप तालुका अध्यक्ष विद्या करडे, कर्नल शिवाजीराव बाबर, राजाभाऊ माळी, संजय बरकाळे उपस्थित होते.
फोटो :- आलाबाद (ता. कागल) येथे जनपंचायत शिवार संवाद कार्यक्रमात बोलताना शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे.