ममुराबाद : गावातील सरपंचपदाचे आरक्षण नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) संवर्गासाठी राखीव निघाल्याने ग्रामपंचायतीची धुरा नेमकी कोणाकडे जाते? त्याकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सरपंचपदासाठी इच्छुकांकडून सदस्यांची जुळवाजुळव सुरू झाली असून निवडणुकीची तारीख घोषित होण्याची सर्वजण वाट पाहत आहेत.
सहा वॉर्डातील १७ जागांसाठी पार पडलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सरपंचपदाच्या आरक्षणाकडे नवनिर्वाचित सदस्यांसह त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले होते. गेल्या वेळी सरपंचपदाचे आरक्षण हे अनुसूचित जमातीसाठी राखीव होते. यंदा नेमके कोणते आरक्षण निघते ? त्याबद्दल संबंधितांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. सरपंचपदाचे आरक्षण मनाजोगते निघावे म्हणून अनेकांनी देव पाण्यातसुद्धा ठेवले होते. त्यातील काहींनी अंदाज बांधून आरक्षण घोषित होण्यापूर्वी मोर्चेबांधणीही सुरू केली होती. प्रत्यक्षात सरपंचपदाचे आरक्षण नेमके नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव निघाल्याने अनेकांच्या आशेवर सपशेल पाणी फेरले गेले. तर ज्यांच्या मनासारखे आरक्षण निघाले त्यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. प्राप्त माहितीनुसार गावात नागरिकांचा मागास प्रवर्ग राखीव पुरुषाच्या जागेवर फक्त दोनच सदस्य निवडून आले आहेत. वॉर्ड एकमधून यंदा सहाव्यांदा निवडलेले हेमंत गोविंद चौधरी आणि वॉर्ड दोनमधून यंदा प्रथमच निवडलेले शैलेंद्र यशवंत पाटील या दोघांचा त्यात समावेश आहे. दुसरीकडे ओबीसी जागेवर महिलासुद्धा दावा करू शकतात, असा मतप्रवाह निर्माण झाला आहे. त्यादृष्टीने कायदेशीर बाबींची चाचपणी काहींनी सुरू केली आहे.
---------------------
- १७ पैकी निम्म्यापेक्षा जास्त सदस्यांचे संख्याबळ जमवून कोण सरपंचपदी विराजमान होते त्याची उत्कंठा ग्रामस्थांमध्ये आहे.
- निवडणुकीची तारीख घोषित होताच संबंधित सर्व सहलीला रवाना होण्याच्या तयारीत आहेत. प्रमुख दावेदार उमेदवारांनी त्याकरिता जय्यत तयारीदेखील करून ठेवली आहे.