शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

राष्‍ट्रधर्मी सिंहगर्जना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:14 IST

लोकमान्य टिळक यांनी केली युगसंमत विचारधारा आणि विवेकसंपन्‍न उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी लेखक : प्राचार्य डॉ. ...

लोकमान्य टिळक यांनी केली युगसंमत विचारधारा आणि विवेकसंपन्‍न उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी

लेखक : प्राचार्य डॉ. विश्‍वास पाटील

आज लोकमान्‍य टिळक यांच्‍या स्‍मृतीचे एकशेएकवे वर्ष. आज त्‍यांच्‍या गुणसंपदेला अभिवादन करत असताना त्‍यांच्‍या व्‍यक्तिमत्त्‍वाच्‍या निरपवाद सर्वमान्‍यता पावलेल्‍या पत्रकारितेचे स्‍मरण करणे कालोचित ठरावे. भारतीय पत्रकारितेच्‍या ऊर्जस्‍वल परंपरेचा पाया रचणारे टिळक आहेत. उच्‍च विद्याविभूषित जन जनसामान्‍यांच्‍या भाषेत बोलत असत, असा तो काळ होता. जनतेच्‍या ठायी साहस व निर्भयतेचा अभाव होता. दिशा सुन्‍न होत्‍या. मार्ग अस्‍पष्‍ट होता. अशा परिस्थितीत एक आत्‍मप्रत्‍ययी समाज उभा करण्‍याचे महत्‍कार्य टिळकांच्‍या पत्रकारितेने केले. टिळकांच्‍या ज्ञानमार्गाच्‍या दिशा अध्‍ययन, अध्‍यापन आणि संशोधन-अनुसंधानाशी संबंधित होत्‍या.

आपल्‍या नाट्यपूर्ण आयुष्‍यात त्‍यांनी तोफ व तलवारीसारखी लेखणी हाती धरली. लोकमताच्‍या प्रशिक्षणासाठी टिळकांनी शब्‍द शस्‍त्रास्‍त्रांचा प्रयोग केला. त्‍यांचे सरळ-साधे व प्राणवान शब्‍द जनांच्‍या हृदयाचा ठाव घेत असत. टिळकांच्‍या वाणी आणि लेखणीने जनमनाला अभिषिक्‍त केले. त्‍यांचे मन, वाणी व विचार एकाकार होते. त्‍यांनी उचललेल्‍या प्रत्‍येक पावलाची शक्‍ती लोकमानसाचे गहिरे स्‍पंदन होते.

खरे पाहू गेल्‍यास पत्रकारितेचे स्‍वरूप प्रासंगिक असते, पण टिळकांची पत्रकारिता शाश्‍वत विचार दानाचे काम करते. त्‍यांनी केवळ युगसंमत विचारधारेला मार्गदर्शन केले, असे नव्‍हे तर परमताचे विवेकसंपन्‍न खंडन करून येणाऱ्या उज्‍ज्‍वल उद्याची पायाभरणी केली. त्‍यांच्‍या वृत्तपत्रीय लेखनाला चिरकाल टिकून राहण्‍याचे सामर्थ्‍य लाभले. ही पत्रकारिता एका प्रभावी राजनेत्‍याची पत्रकारिता होती. त्‍यांच्‍या लेखनाला राष्‍ट्रीय संदर्भाचे वैचारिक अधिष्‍ठान लाभले होते. स्‍वराज्‍याचा मंत्रजागर करून टिळकांनी या राष्‍ट्रवादाच्‍या रोपाला आपल्‍या रक्‍ताने सिंचित केले.

टिळकांची पत्रकारिता एका प्रभावशाली राजकीय पंडिताची पत्रकारिता आहे. यात सुसूत्रता आहे. इतिहासाचा अभ्‍यास करत असताना त्‍यांनी सातत्‍याने इतिहासाची पुनर्मांडणी व पुनरुत्‍थानाचा विचार केला आहे. उत्‍सवांना त्‍यांनी जागरणाचे रूप दिले. सामाजिक मंगलेच्‍छेत रूपांतरित केले. अध्‍यात्‍माऐवजी ईहलोकाचा अभिनव संदर्भ दिला. त्‍यांच्‍या गणिती प्रतिभेने सत्त्‍व, स्‍वत्‍व आणि सद्भावाची पेरणी केली. त्‍यांची राष्‍ट्रीय संकल्‍पना भाषा, भूषा, भवन, भजन, भोजन यासारख्‍या वा धर्म, पंथ, जात, गट, वर्ग यासारख्‍या मर्यादेत सीमित नव्‍हती. तिला एक भव्‍य परिमाण त्‍यांनी अर्पण केले होते. त्‍यांच्‍या पत्रकारितेने केवळ समकालीनच नव्‍हे तर उत्तरवर्ती पत्रकारितेला एक पाठ शिकवला. त्‍याग, संयम आणि भाषिक विवेकाचा पाठ शिकवला.

तात्‍कालिक व समकालीन प्रश्‍नांच्‍या संदर्भात त्‍यांनी केलेली मीमांसा आजही उपयुक्‍त व सार्वकालिक वाटते. आपल्‍या चिरंतन लेखन योग्‍यतेमुळे हे लेखन आजही प्रासंगिक आहे. त्‍यांच्‍या लेखणीचा प्रवास हा सत्‍यापासून सत्‍यापर्यंतचा प्रवास आहे. शाश्‍वत मूल्‍यवत्तेवर त्‍यांची नजर खिळलेली असल्‍यामुळे या लेखनाला असा शाश्‍वताचा सहज स्‍पर्श झाला आहे. टिळक पत्रकारिता लोकमतसमनुयोगाची संजीवक दृष्‍टी अर्पण करणारी पत्रकारिता आहे. शतकापूर्वीच्‍या या पत्रकारितेच्‍या काही पाऊलखुणा आजही प्रत्‍ययकारी आहेत. पत्रकारितेच्‍या क्षेत्रात टिळक म्‍हणजे टिळक आहेत, या नावाला कुठलाही पर्याय नाही. आपल्‍या पूर्ववर्ती पिढीचे काही ऋण त्‍यांच्‍यावर सिद्ध करणे कमालीचे अवघड आहे. ते ‘स्‍वयंमेव मृगेंद्र’ आहेत. त्‍यांनी स्‍वत: आपला मार्ग शोधला व त्‍यावर अखंडपणे मार्गक्रमण करत राहिलेत. त्‍यांच्‍या लेखनाला सातत्‍याने राजद्रोहाचा दाह झेलावा लागला. केवळ टीकाटिप्‍पणी करणे व विपक्षींचे गुण-दोष मांडायचे काम त्‍यांनी केले नाही. स्‍वत: कायदेपंडित असल्‍यामुळे कायदा व न्‍याय या मूल्‍यांवर त्‍यांची अपरिमित श्रद्धा होती. न्‍यायालयात ते सतत पराभूत होत राहिलेत, पण जनतेच्‍या आणि जनता जनार्दनाच्‍या न्‍यायालयाने मात्र त्‍यांना निर्दोष सिद्ध केले. त्‍यांनी देशाची दशा अभ्‍यासली आणि कार्याची दिशा बदलली. एक नवा मार्ग दाखवला. त्‍यांच्‍या राजकीय चिंतनधारेचा आधारबिंदू लोकमत होता. इंग्रजांनी त्‍यांना दिलेल्‍या शिव्‍यांचेही श्‍लोक झालेत. ‘भारतीय असंतोषाचे जनक’ ही होती शिवीच, पण तिचे रूपांतर आपल्‍या भव्‍य कर्तबगारीने त्‍यांनी बिरुदात करून टाकले. पत्रकारिता त्‍यांच्‍यासाठी देशभक्तीचा एक बलिपंथी मार्ग होता. त्‍यांच्‍या पत्रकारितेची त्रिधारा होती जनमनात चैतन्‍याचे जागरण, अन्‍याय व अत्‍याचारांच्‍या विरोधात विद्रोह, सरकारच्‍या विरोधातली प्रश्‍नांकित तर्जनी. ही अग्निमुखी पत्रकारिता होती, आज त्‍यांचे स्‍मरण करत असताना त्‍यांच्‍या पत्रकारितेला नमन करणे ही कालोचित बाब आहे.