२०२०-२१ या वर्षीच्या खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, उडीद या पिकाने शेतकऱ्यांना दगा दिला. तुरीच्या उत्पादनातही घट झाली. आर्थिक गरज असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी कमी दरातही शेतमाल विक्री केला. त्यानंतर मात्र सोयाबीन, हरभरा, तूर, हळद या पिकांच्या दरात वाढ होत गेली. एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत दरवाढ कायम होती. मात्र, शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीसाठी जपून ठेवलेला शेतमाल विक्रीसाठी काढण्यास सुरुवात करताच शेतमालाचे दर पुन्हा घसरण्यास सुरुवात झाली. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जुना मोंढा मार्केट यार्डात सोमवारी गव्हाला २४०० ते १८०० रूपये प्रति क्विंटल भाव मिळाला. तसेच टाळकी १७०० ते २००० रुपये, हरभरा ४८०० ते ५२००, हायब्रीड ९०० ते ११००, तूर ६३५० ते ६७२५, सोयाबीन ६४०० ते ६७०० रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होत होते, तर श्री संत नामदेव हळद मार्केट यार्डात हळदीला ६ हजार ५०० ते ७४०० रुपये भाव मिळाला.
शेतकरी म्हणतात...
खरीप हंगामातील खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतमाल जपून ठेवला होता. मात्र, दरात घसरण झाल्याचे लक्षात येताच काही शेतमाल तसाच ठेवून दिला आहे. केवळ तूर विक्रीसाठी आणली आहे. मात्र, येथे आल्यानंतर भावात घसरण झाल्याचे पहावयास मिळाले. आता कमी दरातही तूर विक्री करावी लागणार आहे.
- विकास इंगळे, शेतकरी.
शेतमालाच्या दरात वाढ होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्रीसाठी बाहेर काढण्यास सुरुवात केली होती. मात्र, पुन्हा शेतमालाच्या दरात घसरण होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल विक्री करण्याचे थांबविले आहे. मंगळवारी हरभऱ्याला ४ हजार ८०० ते ५ हजार २०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.
- नागोराव जाधव, शेतकरी
व्यापारी म्हणतात...
लॉकडाऊनमुळे येथील खरेदी केलेला माल बाहेर राज्यात जात नसल्याने आर्थिक चक्र थांबले आहे. व्यापाऱ्यांकडे खेळता पैसा शिल्लक राहिला नसल्याने शेतमालाच्या दरात घसरण झाली आहे.
- प्रशांत सोनी, व्यापारी
येथील जुना मोंढा भागातील मार्केट यार्डात तूर, सोयाबीन, गहू, हरभरा आदी शेतमाल विक्रीसाठी येत आहे. हळदीचे मार्केट दिवसाआड सुरू असून हळदीला सध्या ६ हजार ५०० ते ७ हजार ४०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे.
- नारायण पाटील, सचिव, कृउबा, हिंगोली.