यांत्रिक प्रगती : जनावरांच्या चारा-पाण्याची समस्या बिकट गोंदिया : आधुनिक युगात यांत्रिक प्रगती झाल्यामुळे आता शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढत आहे. परिणामी दिवसेंदिवस बैल जोड्यांची संख्या कमी होत आहे. त्यामुळेच एकेकाळी प्रसिद्ध असलेले बैल बाजारही आता मोडीत निघालेले दिसत आहे.पूर्वी शेतकरी सालगडी भल्या पहाटे उठून ऊन डोक्यावर येईपर्यंत शेतात नांगरणी- वखरणी करीत होते. दुपारनंतर ऊन्ह ओसरल्यानंतर पुन्हा दुपारनंतर शेतीची मशागत करण्यात ते गुंग होऊन जात होते. कडक उन्हाळ्यात शेतीची मशागत करण्यासाठी शेतकरी सर्ज्या-राज्यासोबत घाम गाळत होते. आताही अनेक शेतकरी बैलजोडीचा वापर करतात. रखरखत्या उन्हात आपल्या ढवळ्या-पवळ्यासोबत ते नांगरणी-वखरणी करतात. उन्हामुळे त्यांच्या जीवाची लाहीलाही होते. मात्र मशागत करणे अतिआवश्यक असल्याने त्याची तमा न बाळगता ते शेतात राबतात. त्याशिवाय काळ्या आईच्या अंगावर हिरवा शालू पांघरणे अशक्य असते. सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे युग आले आहे. आधुनिकीकरणामुळे शेतीही आता आधुनिक झाली आहे. परिणामी शेती मशागतीची कामे आधुनिक यंत्राच्या सहाय्याने करण्यास सुरूवात झाली आहे. पूर्वी नांगरणी-वखरणीसाठी बैलजोडीशिवाय काम भागत नव्हते. आता हिच कामे ट्रॅक्टरने केली जातात. त्यामुळे मशागत त्वरित पूर्ण होण्यास मदत मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. गुरांना वैरण मिळत नसल्याने पाळीव जनावरांची विक्रीही वाढली आहे. सोबतच दिवसेंदिवस शेतकऱ्यांना बैलजोडी विकत घेणे परवडण्यासारखे राहिले नाही. त्यामुळे आता बैलांनी मशागत करणे शेतकऱ्यांना अवघडही जात आहे. शेती कामासाठी मजूर मिळणेही कठीण झाले आहे. मोठ्या शेतकऱ्यांना जोमाने शेती करताना अनेक दिवस लागतात. (प्रतिनिधी)
मशागतीसाठी ट्रॅक्टरकडे कल
By admin | Updated: June 8, 2015 01:32 IST