पणजी : राज्यातील काही मंत्र्यांच्या वारंवार होणाऱ्या विदेश दौऱ्यांवर देशभरातून सडकून टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आता विदेश दौैऱ्यांबाबत निकष निश्चित करण्यास मुख्य सचिवांना सांगितले आहे. मंत्रिमंडळाची बुधवारी बैठक झाली. त्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांशी चर्चा केली व विदेश दौऱ्यांबाबत काही निकष ठरविण्यास मुख्य सचिवांना सांगितले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री पर्रीकर म्हणाले की, मंत्र्यांनी विदेश दौरे केल्याने विविध प्रकारच्या अनुभवांना सामोरे जाता येते. जगात काय घडत आहे, ते मत्र्यांना अशा दौऱ्यांमधून कळते. ज्यांच्याकडून कायदे तयार केले जातात, अशा लोकप्रतिनिधींना असा ‘एक्सपोजर’ मिळायलाच हवा. मात्र, चुकीच्या माणसांनी उगाच विदेश दौऱ्यांवर जाऊन अनाठायी खर्चही करू नये. यासाठीच मंत्री-आमदारांनी विदेश दौरे कधी करावेत, याबाबतचे निकष ठरविण्यास आपण मुख्य सचिवांना सांगितले आहे. ‘कॅग’ने आपल्या अहवालात मंत्र्यांनी सरकारी खर्चाने केलेल्या विदेश दौऱ्यांवर बोट ठेवले आहे. २00७ ते २0१२ या कालावधीत राज्य सरकारकडून ‘रोड शो’वर १९ कोटी खर्च करण्यात आले. काही मंत्री तर शासकीय खर्चाने जग फिरले आहेत. (खास प्रतिनिधी)
मंत्र्यांचे ‘विमान’ जमिनीवर!
By admin | Updated: June 19, 2014 01:14 IST