पणजी : गोवा प्रदेश भाजपने सोमवारी राज्यपाल भारतवीर वांच्छू यांच्यावर नेम साधला. वांच्छू यांनी राज्यपालपदाचा त्वरित राजीनामा द्यावा, अन्यथा केंद्राने त्यांना पदावरून हटवावे, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी येथे सोमवारी पत्रकार परिषदेत केली. प्रवक्ते डॉ. विल्फ्रेड मिस्किता व सदानंद शेट तानावडे यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली. तेंडुलकर म्हणाले की, राज्यपाल वांच्छू यांना हेलिकॉप्टर खरेदी घोटाळा प्रकरणी सीबीआय चौकशीला सामोरे जावे लागत आहे. विशेष संरक्षण दलाचे (एसपीजी) राज्यपाल हे प्रमुख असताना झालेल्या घोटाळा प्रकरणी आता चौकशी होत आहे. त्यामुळे अशी व्यक्ती राज्यपालपदी राहू नये. ते राजीनामा देत नसतील तर त्यांची उचलबांगडी करावी. ते म्हणाले, केंद्रात भाजपचे सरकार येण्यापूर्वी वांच्छू हे गांधी कुटुंबाचे एजंट असल्याप्रमाणे वागत होते. ते खालच्या पातळीवरील राजकारण करत होते. नगरसेवकांसह कोणीही त्यांना भेटून सरकारविरुद्ध तक्रारी करत असे आणि त्याची प्रसिद्धीही होत असे. पर्रीकर सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न राज्यपाल करत होते. ते म्हणाले, २००४ साली केंद्रात काँग्रेसप्रणीत यूपीए सरकार अधिकारावर आले होते. त्या वेळी केदारनाथ साहनी गोव्यात राज्यपाल होते. काँग्रेसने अपमानास्पदरीत्या त्या वेळी साहनी यांचा राजीनामा मागून घेतला होता. (प्रतिनिधी)
राज्यपाल वांच्छू यांना त्वरित हटवा : भाजप
By admin | Updated: June 24, 2014 01:22 IST