भामरागड : तालुक्यातील तुमरकोठी अतिदुर्गम भागासह संपूर्ण तालुक्यात रस्ते, पाणी, वीज, आरोग्य व शिक्षणाची समस्या ऐरणीवर आली आहे. या भागाच्या विकासाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाचे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याने तुमरकोठी भागातील आदिवासी नागरिक नरकयातना भोगत असल्याचे वास्तविक चित्र दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) राबविले जात असले तरी तुमरकोठी दुर्गम भागात हातपंपाला पाणी येत नसल्याने येथील नागरिकांना नाल्यातील पाणी पिऊन तहाण भागवावी लागत आहे. शौचालयाची योजना या भागातील नागरिकांपर्यंत पोहोचली नसल्यामुळे नागरिकांना अंधाराच्या साम्राज्यात जंगल परिसरात उघड्यावर शौचालयाला जावे लागत आहे. त्यामुळे या भागात स्वच्छ भारत मिशनचा पूर्णत: बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. तालुका मुख्यालयापासून ३० किमी अंतरावर कोठी गावापर्यंत जाण्यासाठी डांबरी रस्ता आहे. या मार्गावर दोन बसफेऱ्या सुरू आहे. मात्र कोठीपासून पुढे आठ किमी अंतरापर्यंत अद्यापही रस्ता तयार करण्यात आला नाही. त्यामुळे नागरिकांना ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याअभावी भामरागड तालुक्यातील तब्बल १०० गावातील नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाचे बसचे दर्शन दुर्लभ झाले आहे. यामध्ये तुमरकोठी गावाचा समावेश आहे. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तसेच काही ठिकाणी रस्त्याचा अभाव असल्याने या भागातील नागरिकांना पायवाटेने मार्गक्रमण करावे लागत आहे. तुमरकोठी या ३० घरांचे आदिवासी लोकवस्ती असलेल्या गावात फक्त दोन हातपंप आहेत. दोन्ही हातपंप नादुरूस्त आहेत. त्यामुळे नागरिकांना नजीकच्या नाल्यातील पाणी दूर अंतरावरून आणावे लागत आहे. तुमरकोठी गावात सन २००६-०७ मध्ये शाळा इमारतीचे बांधकाम सुरू करण्यात आले मात्र सदर काम अद्यापही अपूर्ण आहे. अपूर्ण अवस्थेत असलेल्या इमारतीतच शाळा भरवली जात आहे. या शाळेला संरक्षण भिंत नसून पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही. (तालुका प्रतिनिधी)
रस्ता, पाणी समस्या ऐरणीवर
By admin | Updated: February 13, 2015 01:43 IST