काेरची : स्वच्छ सर्वेक्षण २०२० या कार्यक्रमांतर्गत नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने शहर स्वच्छतेसाठी लाखाे रुपये खर्च करून २५ कचराकुंड्यांची व्यवस्था करण्यात आली; मात्र या कचराकुंड्या अल्पावधीतच तुटफुट झाल्याने या कचराकुंड्या निकामी ठरल्या आहेत. या कामाची चाैकशी करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नगरसेवक मनाेज अग्रवाल यांनी केली आहे.
एक वर्षापूर्वी कोरची शहरात नगरपंचायततर्फे स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत २५ ठिकाणी कचराकुंड्या लावण्यात आल्या. प्रत्येक ठिकाणी एक ओला कचरा व सुका कचरा अशा दोन कुंड्या लावण्यात आल्या. त्याकरिता लाखो रुपये खर्चसुद्धा करण्यात आले. परंतु एका वर्षातच ही कचराकुंडीच निकामी ठरली. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत अनेक भिंती रंगविण्यात आल्या. त्याकरिता निधी खर्च करण्यात आले. परंतु आज या भिंतीलाच स्वच्छतेची गरज असल्याचे जाणवत आहे. लावण्यात आलेल्या कचराकुंड्यांमुळे सफाई कामगारांचा सुद्धा ताण कमी होत होता. कारण परिसरातील नागरिक कचराकुंडीत कचरा टाकायचे त्यामुळे परिसर स्वच्छ राहत हाेता. कचराकुंडी ही निकृष्ट दर्जाची असल्यामुळे एक वर्षसुद्धा टिकू शकली नाही.
कचराकुंडी नसल्यामुळे बाहेरुन आलेले नागरिक हे कचरा रस्त्यावर टाकून देतात. त्याकरिता सफाई कामगारांना सुद्धा तारेवरची कसरत करावी लागत असून, याच कचऱ्यावर परिसरातील पाळीव जनावरे ताव मारत असतात. त्यामुळे पशुधन धोक्यात आले आहे. स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत खर्च करण्यात आलेल्या संपूर्ण निधीची चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवक मनोज अग्रवाल यांनी केली आहे.