आरमोरी : शहरासह तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या क्षेत्रात कचरा व्यवस्थापनाचे काम रखडलेले आहे. त्यामुळे अनेक गावांच्या बाहेर कचऱ्याचे ढीग नेऊन टाकले जातात व या कचऱ्यावर दिवसभर जनावरे पसरून राहतात. त्यामुळे येथे कचरा व्यवस्थापन प्रकल्प निर्माण करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. यापूर्वी अनेकदा सदर मागणी करण्यात आली. परंतु, या मागणीकडे दुर्लक्ष झाले.
आलापल्ली-मार्कंडा रस्त्यावर खड्डे
आलापल्ली : मुलचेरा ते मार्कंडा (कं), आलापल्ली ते मुलचेरा व कोपरअल्ली ते घोटमार्गाची अत्यंत दैनावस्था झाली असून रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. याचा त्रास वाहनधारक व शाळकरी मुलांना होत आहे. त्यामुळे या मार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
अंगणवाड्या भरतात भाड्याच्या खोलीत
गडचिरोली : जिल्हाभरातील १०० वर अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे या अंगणवाड्या भाड्याच्या खोलीत भरविल्या जात आहेत. शहरात अत्यंत लहान व कौलारू खोलीत अंगणवाडी चालविली जात आहे. बहुतांश मिनी अंगणवाड्यांना इमारती उपलब्ध नाही.
ठेंगण्या व अरुंद पुलाचा प्रश्न कायमच
गडचिरोली : ब्रिटिशकाळात बांधलेला एकही पूल गडचिरोली जिल्ह्यात नसला, तरी देशाच्या स्वातंत्र्यानंतर तयार करण्यात आलेला चंद्रपूर-आलापल्ली मार्गावरील आष्टीचा पूल ठेंगणा व अरुंद असल्यामुळे या पुलावरून आजवर अनेकांचा वाहन कोसळून बळी गेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातील ठेंगणे व अरुंद पूल हे वाहतुकीसाठी ग्रामीण भागात नेहमीच अडचणीचे ठरलेले आहे.
अंकिसा मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य
अंकिसा : सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथील मुख्य मार्गावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. या मार्गावरून आसरअल्लीदरम्यानच्या गावातील नागरिक ये-जा करीत असल्याने या मार्गावरून वाहनांची नेहमीच वर्दळ राहते. त्यामुळे सदर मार्गाची बांधकाम विभागाने दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याची दुरवस्था
धानोरा : तालुक्यातील खुटगाव येथील प्रवासी निवाऱ्याच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने सध्या प्रवासी निवारा दुरवस्थेत आहे. निर्मितीपासून प्रवासी निवाऱ्याची अद्यापही दुरुस्ती करण्यात आली नाही.
सुसाट दुचाकीधारकांवर कारवाई करा
अहेरी : दुचाकीच्या कर्कश आवाजामुळे शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दुचाकीस्वार भरधाव वेगाने वाहन चालवित असल्याने वाहनांचा कर्कश आवाज शहरातील नागरिकांना ऐकावा लागत आहे.
रस्ते अतिक्रमणाच्या विळख्यात
घोट : शेतीकडे जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण भागात सगर असे संबोधले जाते. रोजगार हमी योजनेंतर्गत याच रस्त्यांना पांदण रस्ता म्हटले जाते. या पांदण रस्त्यांवर शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे शेतीकडे जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. सर्व्हे करून या मार्गाचे रोहयोतून बांधकाम करावे, अशी मागणी आहे.
ऑनलाइन सातबारा झाला डोकेदुखी
ठाणेगाव : ऑनलाइन सातबारा ग्रामीण भागातील शेतक-यांना डोकेदुखी ठरत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना हस्तलिखित सातबारा तलाठी कार्यालयामार्फत पुरवावा, अशी मागणी तालुक्यातील नागरिकांनी केली आहे.
अवैध ले-आउटचा गोरखधंदा जोरात
मुलचेरा : मुलचेरा शहरात अनेक भूमाफियांच्या माध्यमातून सरकारी जमिनीवर प्लॉट पाडून अवैधरीत्या कब्जा करून सदर प्लॉट विक्री करण्याचा गोरखधंदा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, याकडे नगर विकास व जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. अवैध ले-आउटचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आवश्यक त्या ठिकाणी विद्युतखांब द्या
अहेरी : तालुक्यातील अनेक गावांमध्ये वाढीव विद्युतखांब लावून वीजपुरवठा सुरू करण्याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे. परंतु, वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने गावातील काही भागांत रात्रीच्या सुमारास अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते.
मुलचेरा शहरात पाळीव डुकरांचा हैदोस
मुलचेरा : तालुका मुख्यालयी पाळीव डुकरांचा हैदोस निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र, डुकरांचा बंदोबस्त करण्याकडे नगरपंचायतीचे दुर्लक्ष आहे. डुकरांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. अनेक ठिकाणी डुकरांकडून घाणही निर्माण केली जात असल्याने नागरिक त्रस्त आहेत.
समाजकल्याण विभागाचे वसतिगृह हवे
आरमोरी : आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे मुलांचे वसतिगृह नसल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांना इतर वसतिगृहांमध्ये धाव घ्यावी लागत आहे. मात्र, या विद्यार्थ्यांना तेथे प्रवेश मिळेल, याची शाश्वती नसते. त्यामुळे आरमोरी तालुक्यात समाजकल्याण विभागाचे वसतिगृह निर्माण करण्याची गरज आहे.
भरधाव वाहनांवर कारवाई थंडबस्त्यात
आलापल्ली : शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून त्या तुलनेत वाहनांची संख्याही वाढत आहे. मात्र, अनेक वाहनधारक रस्त्यावरून सुसाट वेगाने वाहने चालवतात. त्यामुळे अनेक अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. मात्र, प्रशासनाकडून होणारी कारवाई थंडबस्त्यात आहे.
भामरागड तालुक्यातील गावे लाइनमनअभावी
भामरागड : तालुक्यात आटाचक्की, सार्वजनिक नळपाणीपुरवठा योजना व कृषीपंपांना विद्युतपुरवठा करावा लागतो. यामुळे येथे कर्तव्यदक्ष लाइनमन असणे गरजेचे असते. परंतु अनेक गावांत लाइनमन नसल्याने विद्युतपुरवठा सुरळीत करण्याकडे दुर्लक्ष होत असते. तसेच एका लाइनमनकडे चार ते पाच गावे येत असल्यामुळे ते प्रत्येक गावी सारखाच वेळ देऊ शकत नाही.
प्रवासी निवाऱ्याला झुडुपांचा वेढा
मुलचेरा : तालुक्यातील शांतिग्राम येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला आहे. मात्र, या निवाऱ्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. निवाऱ्याला झुडुपांनी वेढले आहे. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात बसू शकत नाही. उन्हातच बसची वाट बघत बसावे लागते. सातत्याने मागणी करूनही प्रशासनाच्या वतीने प्रवासी निवाऱ्याची दुरुस्ती केली जात नाही.
रिक्त पदांमुळे होतोय कामांवर परिणाम
गडचिरोली : स्थानिक तहसील कार्यालयात लिपिकवर्गाची अनेक पदे रिक्त आहेत. तहसील कार्यालयाच्या मार्फतीने सर्वसामान्य जनतेच्या कल्याणाच्या अनेक योजना राबविण्यात येतात. मात्र, पदे रिक्त असल्याने सदर योजना राबविताना अडचण निर्माण होत आहे. कार्यरत कर्मचाऱ्यांवरही कामाचा भार वाढला आहे.
आठवडी बाजारात ओट्यांची निर्मिती करा
घोट : चामोर्शी तालुक्यातील घोट येथे मंगळवारी आठवडीबाजार भरतो. परिसरातील शेकडो नागरिक वस्तूंच्या खरेदी-विक्रीसाठी बाजारात येतात. मात्र, या बाजारात ओट्यांची व्यवस्था नसल्याने विक्रेत्यांसह ग्राहकांना त्रास होत आहे.
जिल्हा परिषदेसमोर वाढले अतिक्रमण
गडचिरोली : जिल्हा परिषदेकडे जाणाऱ्या मार्गाच्या बाजूला काही दुकानदारांनी अतिक्रमण करून दुकाने थाटली आहेत. मात्र, या दुकानदारांवर कोणतीही कारवाई बांधकाम विभाग तसेच नगर परिषद प्रशासन करीत नसल्याने या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जागा पकडून दुकाने थाटली जात आहेत.
काेराेेनाच्या दुसऱ्या लाटेची चिंता
गडचिराेली : गडचिराेली जिल्ह्यात काही दिवसांनंतर दुसरी लाट आल्यास पुन्हा व्यवहार ठप्प पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाहेर पडताना याेग्य ती खबरदारी घेण्याची गरज आहे. आराेग्य विभागामार्फत जागृती केली जात असली, तरी नागरिकांनी सतर्क राहणे गरजेचे आहे.