'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 10:36 IST2024-12-16T10:36:07+5:302024-12-16T10:36:53+5:30
अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मिडिया पोस्ट करत त्या मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे.

'पुष्पा २' प्रीमियर दुर्घटनेतील ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर; अल्लू अर्जुन म्हणाला, "मी भेटू शकत नाही पण..."
'पुष्पा २: द रुल' (Pushpa: The Rule) हा बहुप्रतिक्षित सिनेमा ५ डिसेंबर रोजी रिलीज झाला. अभिनेता अल्लू अर्जुनची (Allu Arjun) क्रेझ पाहता सिनेमा सध्या धुमाकूळ घालतोय. मात्र सिनेमाच्या लोकप्रियतेला रिलीजच्या आदल्याच दिवशी गालबोट लागलं होतं. हैदराबाद येथील संध्या थिएटरमध्ये सिनेमाच्या प्रीमिअरला झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरीमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. तर तिचा ८ वर्षीय मुलगा व्हेंटिलेटरवर आहे. याप्रकरणी १३ डिसेंबरला अल्लू अर्जुनला अटकही झाली होती. लगेच त्याची जामीनावर सुटका झाली. अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मिडिया पोस्ट करत त्या मुलाविषयी काळजी व्यक्त केली आहे.
अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिले, "मला श्रीतेजची खूप काळजी वाटत आहे. त्या दिवशी झालेल्या दुर्घटनेमुळे श्रीतेजवरसध्या इन्टेन्सिव्ह केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत. कायदेशीर प्रकरणामुळे मला त्याला आणि त्याच्या कुटुंबाला जाऊन भेटण्याची परवानगी नाही. मी त्याच्यासाठी प्रार्थना करत राहीन आणि त्याच्या उपचारासाठी लागेल ती सर्व मदत त्याच्या कुटुंबियांसाठी करण्यास मी तत्पर आहे. तो लवकरात लवकर बरा व्हावा हीच माझी इच्छा आहे. मला त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना लवकरच शक्य तितक्या लवकर भेटायचं आहे."
त्या दिवशी नक्की झालं काय?
४ डिसेंबर रोजी संध्या थिएटरमध्ये 'पुष्पा २' चा प्रीमिअर होता. थिएटरबाहेर चाहत्यांची तुफान गर्दी होती. सगळे जल्लोष करत होते. अल्लू अर्जुनही स्क्रीनिंगला येत असल्याचं समजताच गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. कोणाला उभं राहायलाही जागा नव्हती. परिणामी चेंगराचेंगरी झाली. दिलसुखनगरला राहणारी ३९ वर्षीय रेवती तिच्या पतीसह, ९ वर्षीय श्री तेज या मुलाला आणि ७ वर्षीय सान्विका या मुलीला घेऊन सिनेमा पाहायला आली होती. थिएटरमध्ये अल्लू अर्जुनची एन्ट्री झाली. बाहेरील लोकांनी आतमध्ये येण्यासाठी धक्काबुक्की केली. याचवेळी रेवती आणि त्यांचा मुलगा गुदमरुन बेशुद्ध झाले. ९ वर्षांचा मुलगा गर्दीत अक्षरश:दबला गेला होता. पोलिसांची त्याच्यावर नजर पडली. तातडीने रेवती आणि मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. रेवती यांचा तोपर्यंत मृत्यू झाला होता, तर मुलावर सध्या उपचार सुरु आहेत.