नाटकात काम करण्यासाठी समीर चौघुलेंनी सोडली २५ हजारांची नोकरी, म्हणाले, "त्यावेळी माझ्या पत्नीने..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 05:25 PM2023-11-21T17:25:00+5:302023-11-21T17:37:21+5:30

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या समीर चौघुलेंचे लाखो चाहते आहेत. पण अभिनय क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

विनोदाची अचूक जाण आणि दमदार अभिनयाने प्रेक्षकांना खळखळवून हसवून कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे समीर चौघुले. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून घराघरात पोहोचलेल्या समीर चौघुलेंचे लाखो चाहते आहेत. पण अभिनय क्षेत्रातील त्यांचा हा प्रवास सोपा नव्हता.

कॉलेज जीवनापासूनच चौघुलेंना अभिनयाची ओढ होती. म्हणूनच अभिनय क्षेत्रात आपलं नशीब आजमवण्यासाठी त्यांनी २५ हजाराची नोकरीही सोडली. 'मित्र म्हणे' या पॉडकास्टमध्ये चौघुलेंनी याचा खुलासा केला.

ते म्हणाले, "किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीत मी नोकरी करत होतो. तिथे मी चांगल्या पोस्टला होतो. २००० साली मी यदा कदाचित नाटकासाठी नोकरी सोडली. तेव्हा २५ हजार रुपये पगार होता. त्यावेळी हा पगार खूप होता. तेव्हा क्रेडिट कार्डही नुकतीच आली होती."

"ऑफिसमधून निघाल्यावर मी नाटकाच्या प्रयोगांना जायचो. त्यानंतर रात्री घरी येऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ऑफिसला जायचो.मी मुळातच प्रामाणिक असल्याने ऑफिसमध्येही प्रामाणिकपणे काम करायचो."

"हे पाहून एक दिवस माझी बायको मला म्हणाली की अशाने तू आजारी पडशील. तुझं कामात मन लागत नाहीये. तू नोकरी सोड."

"माझी पत्नीही तेव्हा नोकरी करत होती. तेव्हा ती मला म्हणाली की मीदेखील नोकरी करते. आपण बघू काय होईल ते."

"त्यानंतर मी माझे खर्च कमी केले. रिक्षाचे पैसे वाचवण्यासाठी मी स्टेशनपासून नाट्यगृहांपर्यंत चालत जायचो. मला घरातून काढून टाकलेलं वगैरे असं नाही. पण, पैसै वाचवण्यासाठी मी हे करायचो. अनेकदा पैसे बुडाले देखील आहेत."

"स्ट्रगल करणाऱ्या कलाकारांना कमी पैशातही काम करावं लागतं. प्रत्येकाने हे अनुभवलं आहे. आता मी फोन आल्यावर सांगतो की एवढे पैसे देत असाल तरच मी काम करेन. पण तेव्हा तसं नव्हतं. हा काळ यायला मला २८ वर्ष लागली."