Renuka Shahane : पालकांचा घटस्फोट, लोक म्हणायचे, 'ही तर तुटलेल्या...'; रेणुका शहाणेंनी सांगितल्या कटु आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 10:30 AM2023-03-03T10:30:32+5:302023-03-03T10:49:13+5:30

लहानपणीच आईवडिलांचा घटस्फोट पाहिलेल्या रेणुका शहाणेचेही पहिले लग्नही टिकले नव्हते. लोकांचे टोमणे सहन करावे लागले.

'हम आपके है कौन' मालिकेतील सलमान खानची भाभी म्हणून जिची ओळख झाली ती अभिनेत्री रेणुका शहाणे पुन्हा चर्चेत आहे. नुकतेच ती एका मुलाखतीत वैयक्तिक आयुष्यावर मनमोकळेपणाने बोलली आहे.

रेणुका शहाणे यांना समाजाकडून, लोकांकडून अनेक टोमणे सहन करावे लागले आहेत. त्या लहान असतानाच त्यांच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला. रेणुका यांना समाजाने बोल लावले. ही तुटलेल्या घरातून येते असं त्यांना म्हणलं जायचं.

यानंतर जेव्हा रेणुका यांनी लग्न केलं तेव्हा त्यांचाही पहिल्या पतीसोबत घटस्फोट झाला. त्यांनी मराठी दिग्दर्शक विजय केंकरे यांच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. मात्र एका वर्षातच ते वेगळे झाले.

नुकत्याच पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत रेणुका सांगतात, 'घटस्फोट झाल्यानंतर माझा लग्नावरचा विश्वास उठला होता. मला परत लग्न करण्याची इच्छाच नव्हती. मात्र अचानक माझ्या आयुष्यात आशुतोष आले आणि मला काहीशी समज आली.'

बालपणीबाबत रेणुका म्हणाल्या, 'सुरुवातील मी सर्वांची लाडकी होते. मात्र आई वडील वेगळे झाल्यानंतर लोकांचा दृष्टिकोनच बदलला. हिच्यासोबत खेळू नको ही तुटलेल्या घरातून येते असं इतरांना माझ्याबद्दल सांगितलं जायचं. इतकंच काय तर शिक्षकही टोमणे मारायचे.'

त्रिभंगा सिनेमात एक सीन आहे जिथे त्या तरुण मुलीला तिच्या आईच्या आडनावावरुन विचारले जाते. अगदी तेच लहानपणी माझ्यासोबत झालं होतं असंही त्या म्हणाल्या.

पहिल्या लग्नाबाबत त्या म्हणाल्या, 'मी पहिल्या लग्नातून बरंच काही शिकले. कारण जेव्हा बऱ्याच काळानंतर मी आशुतोषला भेटले आणि प्रेमात पडले तेव्हा मला लग्नाबाबत अजिबात खात्री नव्हती. मी तेव्हापर्यंत सक्षम झाले होते त्यामुळे येणारे उतार चढाव झेलू शकणारे होते.'

रेणुका म्हणतात,'जेव्हा माझे दुसरे लग्न झाले तेव्हा मी ३४ वर्षांची होते. एका सामान्य घरात मुलीने या वयात एवढ्या उशिरा लग्न करणं ही खूप मोठी गोष्ट होती.'

रेणुका शहाणे यांनी २०२१ मध्ये दिग्दर्शनात पदार्पण केले. काजोल, तन्वी आजमी आणि मिथिला पालकर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'त्रिभंगा'सिनेमाचे त्यांनी दिग्दर्शन केले. हा एक फॅमिली ड्रामा होता.

रेणुका आणि आशुतोष यांनी दोन मुलं आहेत. शौर्यमान आणि सत्येंद्र अशी त्यांची नावं आहेत.