बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2025 15:37 IST2025-04-27T15:36:36+5:302025-04-27T15:37:09+5:30
पहलगाम हल्ल्याच्या वेळेस हा मराठी कलाकार बायकोसोबत काश्मिरमध्ये होता. त्यावेळी तिथे काय घडलं याचा अनुभव त्याने व्यक्त केलंय. गेल्या ५ दिवसांपासून हा मराठी कलाकार काश्मिरमध्येच होता. या पाच दिवसात काय घडलं, याचा अनुभव त्याने सांगितलाय

बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
पहलगाम हल्ल्यामुळे (pahalgam attack) संपूर्ण देश हादरुन गेलाय. काश्मिरमध्ये अडकलेले अनेक नागरीक त्यांच्या शहरात सुखरुप परत येत आहेत. याच ठिकाणी महाराष्ट्राचे काही पर्यटक अडकले होते. त्यांनाही त्यांच्या घरी सुखरुप परत आणलं गेलंय. या दुर्दैवी दुर्घटनेत एक मराठी कलाकारही अडकला होता. ज्या दिवशी हा कलाकार काश्मिरला पोहोचला तेव्हाच ही दुर्दैवी घटना घडली. या कलाकाराचं नाव आहे क्षितीज पटवर्धन. क्षितीज (kshitij patwardhan) आणि त्याची पत्नी पल्लवी काश्मिरमधून घरी सुखरुप परतले आहेत. पण गेल्या पाच दिवसांचा अनुभव क्षितीजने शब्दबद्ध केलाय.
क्षितीजने सांगितलं पाच दिवसात काय घडलं?
क्षितीजने सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "ही पोस्ट लिहिताना मी श्रीनगर विमानतळाच्या बोर्डिंग गेटवर बसलो आहे आणि माझ्या मनात एकच भावना भरून राहिली आहे, ती म्हणजे अपार कृतज्ञता. आम्ही ज्या दिवशी येथे पोहोचलो, त्याच दिवशी ही दुर्दैवी घटना घडली. सर्वप्रथम, आम्ही या अमानुष हल्ल्याचा तीव्र निषेध करतो. पीडित कुटुंबांसाठी आमच्या प्रार्थना आहेत. हे नुकसान न भरुन येण्यासारखं आहे. आम्ही दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहोत."
"गेल्या पाच दिवसांत काश्मीरमधील अनुभवाने आम्हाला सुन्न, असुरक्षित आणि चिंताग्रस्त केलं होतं. तरीही येथे मिळालेलं प्रेम, आपुलकी आणि आदर यामुळे आमच्या मनाला दिलासा मिळाला. आमचे टूर ऑपरेटर Highontrips, हॉटेल स्टाफ आणि आमचे गाइड आकिब यांनी केवळ मदतच केली नाही तर आम्हाला घरच्यासारखं सुरक्षित वाटायला लावलं. त्यांनी आम्हाला आपल्या कुटुंबाचा एक भाग समजून प्रेम दिलं."
"आपत्कालीन परिस्थितीतही आम्ही लगेच परत येण्याचा निर्णय घेतला नाही, कारण इतर लोकांना आधी सुरक्षितरित्या हलवणं आवश्यक होतं. आमच्यासोबत असलेल्या या सज्जन आणि दिलदार लोकांमुळेच आम्ही शांतपणे राहू शकलो आणि आम्हाला सुरक्षित वाटलं. या काळात आमची सतत विचारपूस करणाऱ्या सर्व मित्रांचे आणि शुभचिंतकांचे आम्ही मनःपूर्वक आभार मानतो", क्षितीज आणि त्याची पत्नी पल्लवी आज (२७ एप्रिल) सुखरुप त्यांच्या घरी परतले