Baapya Movie: मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ; 'बाप्या'चं उत्कंठावर्धक कथानक, चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:06 IST2026-05-13T11:58:41+5:302026-05-13T12:06:16+5:30
मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या 'बाप्या' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हटके कथानकाची आगळीवेगळी झलक बघायला मिळतेय.

Baapya Movie: मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ; 'बाप्या'चं उत्कंठावर्धक कथानक, चित्रपटाची प्रेक्षकांना उत्सुकता
मैत्री, प्रेम आणि नात्यांमधला गोंधळ एका वेगळ्या ढंगात मांडणाऱ्या 'बाप्या' चित्रपटाची सर्वांना उत्सुकता आहे. पोस्टर आणि गाण्यांमुळे आधीच चर्चेत असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर पाहून हटके कथानकाची आगळीवेगळी झलक बघायला मिळतेय.
राजश्री देशपांडे साकारत असलेली 'बाप्या' ही व्यक्तिरेखा केंद्रस्थानी आहे. तिचा 'शैलजा ते शैलेश' हा प्रवास आणि त्या बदलामुळे नात्यांमध्ये निर्माण होणारी उलथापालथ ट्रेलरमध्ये ठळकपणे दिसते. गिरीश कुलकर्णीशी तिचं आधीच लग्न झालेलं दिसतेय, त्यांना मुलगाही आहे. पण त्याच वेळी गिरीशचं दुसरं आयुष्यही समोर येतं आणि इथूनच सगळ्या नात्यांचा गुंता वाढताना दिसतो. नात्यांमध्ये गोंधळ का निर्माण होतो आणि या सगळ्यात ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही मैत्री नेमकी कोणती भूमिका बजावते, याची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळते.
ट्रेलरमध्ये हलक्याफुलक्या क्षणांसोबतच भावनिक प्रसंगांचीही चांगली सांगड घालण्यात आली आहे. गिरीश कुलकर्णी, राजश्री देशपांडे, देविका दफ्तरदार, श्रीकांत यादव आणि आर्यन मेंगजी यांच्या अभिनयाची झलक प्रभावीपणे दिसते आणि चित्रपटाच्या वेगळ्या मांडणीची जाणीव करून देते. वर्किंग आय फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे समीर तिवारी दिग्दर्शक असून मुत्कल तेलंग आणि समीर तिवारी निर्माते आहेत.
दिग्दर्शक समीर तिवारी म्हणतात, '' 'बाप्या' ही कथा नात्यांभोवती फिरणारी आहे परंतु ती सरळ नाही, ती गुंतागुंतीची आहे. ट्रेलरमधून आम्ही त्या नात्यांची फक्त एक झलक दिली आहे. ‘शैलजा ते शैलेश’ हा प्रवास हा केवळ एका व्यक्तीचा नाही, तर स्वीकार, बदल आणि स्वतःला समजून घेण्याचा आहे. या कथेत मैत्री आहे, प्रेम आहे, ताण आहेत आणि त्या सगळ्यातून उभं राहाण्याची ताकदही आहे. प्रेक्षकांना स्वतःशी जोडून ठेवणारा आणि शेवटपर्यंत गुंतवून ठेवणारा असा अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘आपली यारी… गावावर भारी!’ ही ओळ या सगळ्या नात्यांना एकत्र बांधून ठेवते.''
१५ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या ‘बाप्या’कडून आता ट्रेलरनंतर अपेक्षा आणखी वाढल्या असून, नात्यांचा हा वेगळा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहाण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झाले आहेत. सर्वांना हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पाहण्याची उत्सुकता आहे.