अरेच्चा! 'बॉर्डर २'च्या यशानंतर वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेणार? कारणही आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2026 12:32 IST2026-03-11T12:30:55+5:302026-03-11T12:32:17+5:30
वरुण धवन अभिनयातून एक मोठा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकताच वरुणची भूमिका असलेला 'बॉर्डर २' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. त्यानंतर वरुणने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.

अरेच्चा! 'बॉर्डर २'च्या यशानंतर वरुण धवन अभिनयातून ब्रेक घेणार? कारणही आलं समोर
बॉलिवूड अभिनेता वरुण धवन सध्या त्याच्या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. नुकताच तो सनी देओलसोबत 'बॉर्डर २' मध्ये दिसला होता, जिथे त्याच्या कामाचे खूप कौतुक झाले. मात्र, आता वरुणच्या चाहत्यांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. वरुण धवन अभिनयातून एक मोठा ब्रेक घेण्याच्या तयारीत आहे. नुकताच वरुणची भूमिका असलेला 'बॉर्डर २' सिनेमा चांगलाच यशस्वी झाला. त्यानंतर वरुणने हा निर्णय घेतल्याचं समजतंय.
ब्रेक घेण्याचे कारण काय?
गेल्या काही वर्षांपासून वरुण सतत चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. 'फिल्मफेअर'ने दिलेल्या वृत्तानुसार, 'बॉर्डर २' च्या रिलीजनंतर वरुणला काही काळ कामातून लांब राहायचे आहे. यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे, वरुणला त्याच्या कुटुंबासोबत, विशेषतः त्याची मुलगी लारासोबत जास्तीत जास्त वेळ घालवायचा आहे. आपल्या मुलीच्या बालपणातील महत्त्वाचे क्षण वरुणला चुकवायचे नाहीत. म्हणून वरुण काही काळ सिनेमांपासून दूर राहणार असल्याचं समजतंय.
पुढील चित्रपट आणि प्रदर्शनाची तारीख
वरुण धवन सध्या त्याच्या आगामी 'है जवानी तो इश्क होना है' या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहे. हा चित्रपट सुरुवातीला ५ जून रोजी प्रदर्शित होणार होता, परंतु यशच्या 'टॉक्सिक' चित्रपटाशी होणारी टक्कर टाळण्यासाठी आता तो १२ जून रोजी प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन त्याचे वडील डेव्हिड धवन यांनी केले असून यामध्ये पूजा हेगडे, मृणाल ठाकूर आणि चंकी पांडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
२०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' मधून पदार्पण करणाऱ्या वरुणने 'बदलापूर', 'ऑक्टोबर', 'जुडवा २', 'भेडिया' यांसारख्या अनेक हिट चित्रपटांतून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. नुकताच त्याने आयुष्मान खुरानाच्या 'थामा' चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून छोटी भूमिकाही साकारली होती. वरुणचा 'बॉर्डर २' सुद्धा हिट झाल्याने तो सध्या आनंदात आहे.