Rajpal Yadav Case: हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं; म्हणाले- "तुम्ही शब्द पाळला नाही..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 14:03 IST2026-02-12T13:58:38+5:302026-02-12T14:03:38+5:30
Rajpal Yadav Bail Hearing Update: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची सध्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने अभिनेत्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि त्यांना जामीन देण्याबाबत कठोर भूमिका घेतली.

Rajpal Yadav Case: हायकोर्टाने राजपाल यादवला फटकारलं; म्हणाले- "तुम्ही शब्द पाळला नाही..."
बॉलिवूड अभिनेता राजपाल यादवची सध्या ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात दिल्लीउच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यावेळी न्यायालयाने अभिनेत्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढले आणि त्यांना जामीन देण्याबाबत कठोर भूमिका घेतली.
न्यायालयाची कडक भूमिका
न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडली. राजपाल यादव यांनी कुटुंबातील लग्नाचे कारण देऊन जामिनाची मागणी केली होती. त्यांच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले की, राजपाल आजच काही रक्कम जमा करण्यास तयार आहेत. मात्र, यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला. न्यायमूर्तींनी म्हटले की, "राजपाल यादव यांनी यापूर्वी डझनभर वेळा अशी आश्वासने दिली आहेत, पण ती कधीही पूर्ण केली नाहीत.''
''तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही, म्हणूनच तुम्ही आज तुरुंगात आहात. तुम्ही आधीच तुमचं मन तयार केलंय.", अशाप्रकारे न्यायमूर्तींनी राजपाल यादव यांना सुनावलं. या प्रकरणाची पुढील सुनावणी दुपारी अडीचच्या सुमारास होणार आहे.
प्रकरण काय आहे?
हे प्रकरण २०१० मधील असून, राजपाल यादवने त्याचा दिग्दर्शनातील पहिला चित्रपट 'अता पता लापता' बनवण्यासाठी मुरली प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडकडून ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होतं. हे कर्ज व्याजासह ८ ते ९ कोटींच्या घरात पोहोचले आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, ज्यामुळे राजपालला मोठे आर्थिक नुकसान झाले. त्याने कर्ज परतफेडीसाठी दिलेले चेक बाऊन्स झाले, त्यानंतर कंपनीने त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
तुरुंगात जाण्याची वेळ का आली?
या प्रकरणात कडकडूमा न्यायालयाने यादवला अनेकदा नोटिसा पाठवल्या होत्या, परंतु ते न्यायालयात हजर झाले नाहीत. तसेच, चुकीचे प्रतिज्ञापत्र दिल्याबद्दल २०१३ मध्येही त्याला काही दिवस कोठडीत राहावे लागले होते. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी त्यांनी अखेर तिहार तुरुंगात आत्मसमर्पण केलं.
राजपाल यादवच्या भावाच्या मुलीचे लग्न असल्याने त्याने जामिनासाठी अर्ज केला होता. त्याच्या वकिलाने तातडीने पैसे जमा करण्याची तयारी दर्शवली असली, तरी न्यायालयाने त्यांच्या मागील रेकॉर्डकडे बोट दाखवत त्यांना फटकारले. आता या प्रकरणाच्या पुढील सुनावणीमध्ये काय निष्पन्न होणार, याची सर्वांना उत्सुकता आहे.
राजपाल यादवला यापूर्वी न्यायालयाने सहा महिन्यांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली होती, ज्याला त्याने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सध्या राजपालला जामीन मिळणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.