Raja Shivaji: अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; अनेकांना माहितच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2026 16:11 IST2026-05-06T16:10:51+5:302026-05-06T16:11:48+5:30
'राजा शिवाजी'मध्ये अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; तुम्ही ओळखलं का?

Raja Shivaji: अफजल खानाचा गुरू 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचा 'हा' दिग्गज अभिनेता; अनेकांना माहितच नाही!
अभिनेता रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा ऐतिहासिक मराठी चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या चर्चेत आहे. १ मे रोजी प्रदर्शित झालेल्या या भव्य चित्रपटात बॉलिवूड आणि मराठी कलाकारांची तगडी फौज पाहायला मिळते. विशेष म्हणजे, संजय दत्तनं साकारलेला अफजल खान प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. क्रूर आणि आक्रमक अफजल खानाची व्यक्तिरेखा संजय दत्तनं प्रभावीपणे उभी केली आहे. त्यांच्या अभिनयामुळे या ऐतिहासिक पात्राला एक वेगळीच धार मिळाली आहे. मात्र, या चित्रपटात अफजल खानाच्या आध्यात्मिक गुरू 'पीर बाबा'ची भूमिका देखील तितकीच चर्चेत आहे.
'पीर बाबा' या भूमिकेत नेमका कोणता अभिनेता आहे, हे अनेकांना ओळखता आलं नाही. पण तुम्हाला सांगायचं झालं तर, 'पीर बाबा'च्या भूमिकेत बॉलिवूडचे दिग्गज बोमन इराणी झळकले आहेत. साधारणपणे वेगळ्या आणि प्रभावी भूमिकांसाठी ओळखले जाणारे बोमन इराणी यांनी या चित्रपटात पीर बाबाची भूमिका साकारत पुन्हा एकदा आपल्या अभिनयाची छाप पाडली.
बोमन इराणींनी फिल्मसाठी दिला नव्हता होकार
बोमन इराणी यांनी या फिल्ममध्ये त्यांची एन्ट्री कशी झाली याचा खुलासा केला आहे. बोमन इराणी म्हणाले, "बऱ्याचदा लोक विचारतात की मी या सिनेमाला होकार का दिला? पण खरं सांगू तर, मला कुणी विचारलंच नव्हतं. रितेशचा मला फोन आला आणि त्याने विचारलं की "३० तारखेला काय करतोयस?" मी म्हटलं काही विशेष नाही. त्यावर तो म्हणाला, "ठीक आहे, मी तुला लोकेशनचा पत्ता पाठवतोय, तिथे पोहच". अशा प्रकारे कोणतंही रितसर ऑफर न मिळता मी या ऐतिहासिक प्रवासाचा भाग झालो".
दरम्यान, इतिहासानुसार, अफजल खानाने छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध मोहीम सुरू करण्यापूर्वी आपल्या आध्यात्मिक गुरूकडून आशीर्वाद घेतला होता. असे मानले जाते की, त्या वेळी पीर बाबाने खानाला अपयशाचा इशारा दिला होता. या भाकितामुळे अफजल खान अस्वस्थ झाला होता. काही ऐतिहासिक संदर्भांनुसार, यानंतर त्याने आपल्या हरममधील ६३ बेगमांची हत्या केल्याचाही उल्लेख आढळतो. आपल्या मृत्यूनंतर त्या परपुरुषाच्या हाती लागू नयेत यासाठी अफजल खानानं असं केलं होतं.