राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राजकारण असतं? परेश रावल स्पष्टच म्हणाले- "त्यांच्या निवडीमागे..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 11:53 IST2025-11-03T11:51:54+5:302025-11-03T11:53:12+5:30
राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यातील राजकारणाबद्दल परेश रावल यांनी त्यांचं स्पष्ट मत व्यक्त केलंय. काय म्हणाले अभिनेते?

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात राजकारण असतं? परेश रावल स्पष्टच म्हणाले- "त्यांच्या निवडीमागे..."
बॉलिवूडचे ज्येष्ठ आणि हरहुन्नरी अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी पुरस्कारांच्या निवडीबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की, राष्ट्रीय पुरस्कारांपासून ते ऑस्करपर्यंत अनेक मोठ्या पुरस्कारांमध्ये लॉबिंग आणि राजकारण चालते. परेश रावल यांनी कोणतेही आढेवेढे न घेता पुरस्काराबद्दल त्यांचं परखड मत मांडलं आहे.
राज शमानीला दिलेल्या मुलाखतीत परेश रावल यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. परेश रावल म्हणतात, "पुरस्कारांच्या निवडीमध्ये लॉबिंगचा मोठा वाटा असतो, मग तो राष्ट्रीय पुरस्कार असो वा ऑस्कर. अनेकदा पुरस्कारांच्या निवडीमागे मोठे राजकारण असते. नेटवर्कींगच्या माध्यमातून ही प्रक्रिया चालते. यामुळे अनेकदा पुरस्काराठी खरंच पात्र असलेल्या अभिनेत्यांना आणि कलाकारांना त्यांचं योग्य श्रेय मिळत नाही'', असं मत त्यांनी व्यक्त केलं.
पुरस्कारांपेक्षा कोणत्या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत, हे सांगताना परेश रावल म्हणाले, "माझ्यासाठी पुरस्कारांचे जास्त महत्त्व नाही. पुरस्कार जिंकला काय किंवा नाही काय, याचा माझ्यावर फारसा फरक पडत नाही. माझ्या कामाचं लेखक आणि दिग्दर्शक यांनी केलेलं कौतुक हे माझ्यासाठी कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठे आहे. प्रेक्षकांचे प्रेम आणि त्यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खरी कमाई आहे. मी अनेकदा भूमिका आवडते म्हणून एखादा चित्रपट करतो. त्यासाठी पुरस्कार मिळावा ही माझी अपेक्षा नसते.'' परेश रावल यांचा 'द ताज स्टोरी' हा नवीन हिंदी सिनेमा नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.