'लाहौर १९४७' बद्दल आली मोठी अपडेट! निर्मात्यांनी थेट सिनेमाचं नावच बदललं, कारण आलं समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 10:35 IST2026-03-09T10:29:36+5:302026-03-09T10:35:42+5:30
बॉलिवूडचा 'गदर' स्टार सनी देओल आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान गेल्या काही काळापासून त्यांच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.

'लाहौर १९४७' बद्दल आली मोठी अपडेट! निर्मात्यांनी थेट सिनेमाचं नावच बदललं, कारण आलं समोर
बॉलिवूडचा 'गदर' स्टार सनी देओल आणि मिस्टर परफेक्टनिस्ट आमिर खान गेल्या काही काळापासून त्यांच्या 'लाहोर १९४७' या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या ऐतिहासिक चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, आता या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून, निर्मात्यांनी चित्रपटाचे नाव बदलण्याचा निर्णय घेतला आहे.
'लाहोर १९४७' ऐवजी आता हा चित्रपट 'बंटवारा १९४७' (Batwara 1947) या नावाने ओळखला जाणार आहे. या चित्रपटाची निर्मिती आमिर खानच्या प्रॉडक्शन हाऊसद्वारे केली जात असून, राजकुमार संतोषी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. सध्या भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण वातावरण पाहता होणारा संभाव्य वाद टाळून निर्मात्यांनी 'बंटवारा १९४७' हे नाव सिनेमाला देण्याचा निर्णय घेतला आहे.
काय असणार सिनेमाची कथा?
'बंटवारा १९४७' या चित्रपटाची कथा एका मुस्लिम कुटुंबाभोवती फिरते, जे फाळणीच्या वेळी लखनऊ सोडून लाहोरला स्थलांतरित होतात. लाहोरमध्ये पोहोचल्यावर त्यांना एका हिंदू कुटुंबाने रिकामी केलेली एक मोठी हवेली राहण्यासाठी दिली जाते. मात्र, या मुस्लिम कुटुंबाला समजते की त्या हवेलीत एक हिंदू कुटुंब अजूनही वास्तव्यास आहे आणि ते आपले घर सोडून जाण्यास ठाम नकार देत आहेत. एकाच छताखाली दोन वेगळ्या धर्माच्या आणि परिस्थितीच्या कुटुंबांमधील हा संघर्ष यातून पाहायला मिळणार आहे.
आमिर खानने या चित्रपटाची निर्मिती केली असून, यात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. सनी देओल मुख्य भूमिकेत असून त्याच्यासोबत प्रीती झिंटा, शबाना आझमी, अली फजल, अभिमन्यु सिंह आणि सनीचा मुलगा करण देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. अनेक वर्षांनंतर सनी देओल आणि प्रीती झिंटा ही जोडी पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र येणार असल्याने चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.
चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही आता समोर आली आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर, म्हणजेच १३ ऑगस्ट २०२६ रोजी हा चित्रपट जगभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. फाळणीच्या ७९ व्या स्मृती दिनानिमित्त हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच भावनिक अनुभव ठरेल यात शंका नाही.