विवाहित असूनही जॅकी-रकुल 'सिच्युएशनशिप'मध्ये! बायको समोर उचलतो एक्स-गर्लफ्रेंडचा फोन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:44 IST2026-04-24T09:39:16+5:302026-04-24T09:44:08+5:30
रकुल-जॅकीच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. या जोडीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.

विवाहित असूनही जॅकी-रकुल 'सिच्युएशनशिप'मध्ये! बायको समोर उचलतो एक्स-गर्लफ्रेंडचा फोन
Jackky Bhagnani Rakul Preet Singh Relationship : बॉलिवूडमधील सर्वात क्युट जोड्यांपैकी एक म्हणून रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांच्याकडे पाहिले जाते. २१ फेब्रुवारी २०२४ रोजी ही जोडी विवाहबंधनात अडकली होती. रकुल-जॅकीच्या लग्नसोहळ्यात बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. त्यांच्या लग्नाला दोन वर्षे पूर्ण होत आली आहेत. या जोडीनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अनेक खुलासे केले आहेत.
'जिंगाबाद' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत जॅकी म्हणाला, "आम्ही आता २०-२१ वर्षांचे तरुण नाही. आयुष्यात बरेच चढ-उतार पाहिले आहेत. मी स्वतः एक आनंदी व्यक्ती आहे आणि माझ्या आयुष्यातील एखादी पोकळी भरून काढण्यासाठी मी कोणाचा शोध घेत नव्हतो. रकुल सुद्धा स्वतःमध्ये खूप आनंदी असते. जेव्हा दोन आनंदी व्यक्ती एकत्र येतात, तेव्हा त्यांचा आनंद द्विगुणित होतो".
जॅकीने पुढे सांगितलं की, "रकुल आणि माझं नातं एका अर्थाने 'सिच्युएशनशिप'सारखं आहे, जिथे आम्ही एकमेकांसाठीच बनलो आहोत. आमच्यात इतकी पारदर्शकता आहे की, रकुल समोर असताना माझ्या एखाद्या एक्स-गर्लफ्रेंडचा फोन आला, तर तो स्पीकरवर ठेवण्यास मला किंचितही संकोच वाटत नाही. मी माझ्या पत्नीपासून काहीही लपवत नाही, त्यामुळे मला कधीच घुसमटल्यासारखं वाटत नाही".
रकुल म्हणाली की, "आम्ही पती-पत्नी असलो तरी त्याआधी एकमेकांचे जिवलग मित्र आहोत. आम्ही एकमेकांसाठी नक्कीच आहोत, पण आम्ही एकमेकांवर मानसिकदृष्ट्या अवलंबून नाही. जर जॅकी मला फिरायला घेऊन गेला नाही, तर मी एकटीही जाऊ शकते. आम्हा दोघांकडेही आयुष्यात चर्चा करण्यासाठी यापेक्षा कितीतरी अधिक महत्त्वाचे विषय आहेत". दरम्यान, चित्रपटांमध्ये अनेकदा 'विरुद्ध स्वभाव एकमेकांकडे आकर्षित होतात' असे दाखवले जाते, मात्र जॅकीच्या मते खऱ्या आयुष्यात हे समीकरण फार काळ टिकत नाही. जर विचार, सवयी आणि आवडीनिवडी जुळत नसतील, तर कालांतराने नात्यात अंतर वाढते, असे मत त्याने मांडले.