"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2026 16:08 IST2026-03-20T16:02:36+5:302026-03-20T16:08:05+5:30
रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

"अभिनयात सर्वांना खाऊन टाकलं"; अर्जुन रामपालने 'धुरंधर २' पाहून केलं 'या' अभिनेत्याचं कौतुक
रणवीर सिंगचा 'धुरंधर २: द रिव्हेंज' (Dhurandhar: The Revenge) हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करत आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने भारतात १०० कोटी आणि जगभरात २०० कोटींचा टप्पा पार करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच चित्रपटाचे एक विशेष स्क्रीनिंग आयोजित करण्यात आले होते, ज्यातील एक मजेशीर व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
अर्जुन रामपालची 'ती' कमेंट झाली व्हायरल?
ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांनी या स्क्रीनिंगचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटाचे दिग्दर्शक आदित्य धर मनोगत व्यक्त करताना दिसत आहेत. चित्रपट संपल्यानंतर राकेश बेदी गमतीने म्हणतात, "चला मित्रांनो, चित्रपट तर पाहून झाला, आता काहीतरी खायला द्या, भुकेने जीव जाईल आता." राकेश बेदींचे हे बोलणे ऐकून चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका साकारणारा अर्जुन रामपाल हसत म्हणाला, "सर, तुम्ही तर अभिनयात आम्हा सगळ्यांनाच खाऊन टाकलंय, आता अजून किती खाणार?" अर्जुनची ही कमेंट ऐकून तिथे उपस्थित असलेले सर्वजण हसू लागले.
राकेश बेदी ठरले चित्रपटाचे 'सरप्राईज पॅकेज'
ज्यांनी हा चित्रपट पाहिला आहे, त्यांना अर्जुन रामपालच्या या कमेंटचा अर्थ लगेच समजेल. 'धुरंधर २' मध्ये राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका राजकारण्याचं पात्र साकारलं आहे. चित्रपटात रणवीर सिंग आणि अर्जुन रामपाल मुख्य भूमिकेत असले, तरी राकेश बेदींच्या अभिनयाने प्रेक्षकांना थक्क केले आहे. त्यांच्या दमदार परफॉर्मन्समुळेच अर्जुनने त्यांना "सगळ्यांना खाऊन टाकलं" असं गंमतीने म्हटले.
यापूर्वी राकेश बेदींनी एका मुलाखतीत सांगितले होते की, शूटिंगच्या शेवटच्या दिवशी रणवीर सिंगने माईक हातात घेऊन सर्वांसमोर त्यांचे कौतुक केले होते. रणवीर म्हणाला होता की, "जर हा चित्रपट १००० कोटींची कमाई करेल, तर त्यातील ५०० कोटींचे श्रेय केवळ राकेश जींच्या अभिनयाला असेल." आदित्य धर दिग्दर्शित या चित्रपटात रणवीर सिंग, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. सध्या सर्वत्र या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या अभिनयाची चर्चा रंगली आहे.