"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2026 11:24 IST2026-01-31T11:21:43+5:302026-01-31T11:24:32+5:30
मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं

"मला सोशल मीडिया बंद करुन दूर जावंसं वाटत होतं"; आलिया भटचा मोठा खुलासा, कारणही सांगितलं
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट सध्या तिच्या करिअरमध्ये व्यस्त आहे. याशिवाय लेक राहासोबत वेळ घालवण्यासही आलिया प्राधान्य देते मात्र, नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने आपल्या मनातील एक मोठी खंत बोलून दाखवली आहे. लेक राहाच्या जन्मानंतर आलियाला तिचे सोशल मीडिया अकाउंट कायमचे डिलीट करायचे होते, असा खुलासा तिने केला आहे.
आलियाने एस्क्वायर इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आई झाल्यानंतर तिच्या आयुष्यातील प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलले आहेत. सोशल मीडियावर होणारी सततची टीका, ट्रोलिंग आणि लोकांच्या अनावश्यक कमेंट्सचा तिच्या मानसिक शांततेवर परिणाम होत होता. आपल्या मुलीसोबत वेळ घालवताना बाहेरच्या जगातील या नकारात्मकतेचा स्पर्शही तिला नको होता. "मानसिक शांततेसाठी सोशल मीडियापासून दूर राहणे अधिक महत्त्वाचे वाटते," असे आलिया यावेळी म्हणाली.
मुलाखतीत तिने पुढे नमूद केले की, अनेकदा लोक कोणत्याही गोष्टीवरून कलाकारांना ट्रोल करतात. कधी अभिनयावरून तर कधी वैयक्तिक आयुष्यावरून होणाऱ्या या टीकेचा सामना करणे कठीण जाते. विशेषतः जेव्हा तुम्ही आई-बाबा होतात, तेव्हा तुम्ही तुमच्या मुलाच्या सुरक्षिततेबाबत आणि भविष्याबाबत अधिक संवेदनशील होता. यामुळेच या सर्व एका क्षणी आलियाला असे वाटले की, हे सर्व बंद करून सोशल मीडियावरून बाहेर पडावे.
मात्र, चाहत्यांचे प्रेम आणि आपल्या कामाची गरज ओळखून तिने हा टोकाचा निर्णय घेतला नाही. सध्या आलिया सोशल मीडियाचा वापर अत्यंत मर्यादित आणि केवळ आवश्यक कामासाठीच करत असल्याचे दिसून येते. आपल्या मानसिक स्वास्थ्याला जपण्यासाठी तिने नकारात्मक कमेंट्सकडे दुर्लक्ष करणे शिकले आहे, असेही तिने स्पष्ट केले.