'धुरंधर'नंतर सारा अर्जुनने कोणताही चित्रपट स्वीकारला नाहीये! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2026 14:08 IST2026-03-09T14:06:25+5:302026-03-09T14:08:05+5:30
सारा अर्जुनच्या भविष्यातील प्रोजेक्ट्सबद्दल प्रसिद्ध दिग्दर्शकाने खुलासा केला. त्यामुळे साराच्या चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

'धुरंधर'नंतर सारा अर्जुनने कोणताही चित्रपट स्वीकारला नाहीये! प्रसिद्ध दिग्दर्शकाचा मोठा खुलासा
दिग्दर्शक इम्तियाज अली यांनी १४ फेब्रुवारी रोजी, म्हणजेच व्हॅलेंटाईन डेच्या मुहूर्तावर आपल्या आगामी 'हीर रांझा' या चित्रपटाची घोषणा केली होती. या व्हिडिओमध्ये 'लैला मजनू'ची झलक पाहायला मिळाली होती, ज्यामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या चित्रपटात 'धुरंधर' फेम अभिनेत्री सारा अर्जुन मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा रंगत होती. आता या चर्चांवर प्रसिद्ध कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी खुलासा केला आहे.
सारा अर्जुनच्या कास्टिंगबाबत सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांवर मुकेश छाब्रा यांनी ट्विट द्वारे पूर्णविराम दिला आहे. त्यांनी स्पष्ट केले की, ''सारा अर्जुनने सध्या कोणताही नवीन चित्रपट साइन केलेला नाही. साराने अद्याप 'हीर रांझा' किंवा इतर कोणताही प्रोजेक्ट स्वीकारलेला नाही, तसेच तिने या संदर्भात कोणाची भेटही घेतलेली नाही. आम्ही सध्या केवळ 'धुरंधर २' (D2) च्या प्रदर्शनाची वाट पाहत आहोत. त्यामुळे कृपया अफवांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा तिची पुढची फिल्म नक्की होईल, तेव्हा मी स्वतः त्याबद्दल अधिकृत माहिती देईन."
सारा अर्जुनचे आगामी प्रोजेक्ट्स
सारा अर्जुन सध्या तिच्या आगामी 'धुरंधर २' या चित्रपटामुळे चर्चेत आहे, ज्यामध्ये ती अभिनेता रणवीर सिंगसोबत महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून १९ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'धुरंधर'च्या पहिल्या भागातील तिच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते, त्यामुळे आता 'धुरंधर २' कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
'हीर रांझा' हा चित्रपट प्रसिद्ध पंजाबी लोककथेवर आधारित एक भव्य रोमँटिक कथा असेल. विशेष म्हणजे, या चित्रपटाची निर्मिती एकता कपूर करत असून याला 'लैला मजनू' फ्रँचायझीचा दुसरा भाग (चॅप्टर २) मानले जात आहे. इम्तियाज अली आणि त्यांचे बंधू साजिद अली या ऐतिहासिक प्रेमकथेला नव्या स्वरूपात पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. 'लैला मजनू'च्या यशानंतर या फ्रँचायझीकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत.