राजपाल यादव यांना अद्याप जामीन नाही! पत्नी राधाचा मोठा खुलासा, चर्चांना मिळाला पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 09:01 IST2026-02-16T08:59:36+5:302026-02-16T09:01:37+5:30
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या एका ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. त्यांची जामिनावर सुटका झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या पत्नी राधा यादव यांनी या सर्व बातम्या फेटाळून आहेत

राजपाल यादव यांना अद्याप जामीन नाही! पत्नी राधाचा मोठा खुलासा, चर्चांना मिळाला पूर्णविराम
बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते राजपाल यादव सध्या एका ९ कोटी रुपयांच्या चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर राजपाल यादव यांची जामिनावर सुटका झाल्याची चर्चा होती. मात्र, त्यांच्या पत्नी राधा यादव यांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या असून, राजपाल अद्याप तुरुंगातच असल्याचे स्पष्ट केले आहे.
अफवा कशी पसरली?
सोशल मीडियावर राजपाल यादव यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये ते अभिनेता सलमान खानचे आभार मानताना दिसत होते. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी असा अंदाज लावला की, सलमान खानच्या मदतीमुळे राजपाल यादव यांची सुटका झाली आहे. मात्र, हा व्हिडिओ जुना असून त्याचा सध्याच्या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे समोर आले आहे.
पत्नी राधा यादव यांचे स्पष्टीकरण
'बॉम्बे टाइम्स'शी बोलताना राधा यादव यांनी सांगितले की, "राजपाल यादव अजूनही तिहार तुरुंगातच आहेत. त्यांच्या जामीन अर्जावर आज सोमवारी (१६ फेब्रुवारी) सुनावणी होणार आहे. त्या सुनावणीनंतरच त्यांच्या सुटकेबाबत निर्णय होईल." राजपाल यांच्या तब्येतीबद्दल विचारले असता, त्यांनी सांगितले की ते सध्या ठीक आहेत आणि न्यायालयीन प्रक्रियेचा आदर करत आहेत.
राधा यादव यांनी पुढे आशा व्यक्त केली की, राजपाल लवकरच तुरुंगाबाहेर येतील. "आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. एकदा का ते बाहेर आले की, ते स्वतः प्रसारमाध्यमांशी बोलतील आणि या प्रकरणावर आपली बाजू अधिक स्पष्टपणे मांडतील," असेही त्यांनी नमूद केले.
काय आहे नेमके प्रकरण?
२०१० मध्ये राजपाल यादव यांनी त्यांच्या 'अता पता लापता' या चित्रपटासाठी ५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. व्याजासह ही रक्कम आता ९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. हे कर्ज न फेडल्यामुळे आणि चेक बाऊन्स झाल्यामुळे ५ फेब्रुवारी रोजी त्यांनी न्यायालयात शरणागती पत्करली होती, त्यानंतर त्यांची रवानगी तिहार तुरुंगात करण्यात आली.