उद्याचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अलीकडेच फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. साहजिकच त्याच फ्रान्सचे अध्यक्ष भारतात येणार म्हटल्यावर ‘इसिस’सारख्या दहशतवादी संघटनेच्या कारवायांबाबत सुरक्षा यंत्रणा अतिदक्ष असणार आणि कोणताही धोका निर्माण होऊ नये म्हणून पुरेपूर सावधानता बाळगणार, हे ओघानेच आले. देशाच्या विविध राज्यांतून किमान १३ जणांना राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण संघटनेने (नॅशनल इनव्हेस्टिगेटिंग एजन्सी - एनआयए) ताब्यात घेण्याची जी कारवाई केल्याचे जाहीर झाले आहे, ते या सावधानतेचेच फळ मानायला हवे. दहशतवादाशी सामना करताना अशी सावधानता बाळगणे ही पूर्वअटच असते. जेव्हा एखादा हल्ला होतो, तेव्हा त्याआधी अशा प्रकारच्या कित्येक हल्ल्याच्या दहशतवाद्यांनी आखलेल्या योजना सुरक्षा यंत्रणांच्या सावधानतेमुळे नेस्तनाबूत केल्या गेलेल्या असतात. म्हणून ‘एनआयए’ने केलेली कारवाई कौतुकास्पदच आहे. मात्र अशा सावधानतेला संयमाची जोड देणेही तितकेच अत्यावश्यक आहे, याचेही भान राखले जायला हवे. दुर्दैवाने अनेकदा नेमके हेच घडत नाही. ‘एनआयए’ने केलेल्या कारवाईनंतरही जी काही विधाने केली जात आहेत, ज्या काही चर्चा वृत्तवाहिन्यांवर होत आहेत आणि जे काही विश्लेषक वृत्तांत प्रसिद्ध झाले आहेत, त्यात कोठे ना कोठे हे भान सुटल्याचे दिसून येत आहे. असे घडण्याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या काही वर्षांत दहशतवादाचे बदलत गेलेले स्वरूप लक्षात न घेण्याची मनोभूमिका हे आहे. ‘इस्लामी दहशतवाद’ म्हटले की ‘दाढी वाढवलेले, धर्मवेडे, कुराणापलीकडे जगाचे भान नसलेले’, अशी एक प्रतिमा रंगवली गेली आहे. प्रत्यक्षात अमेरिकेतील व ९/११ च्या हल्ल्यानंतरच्या बहुतेक सर्व दहशतवादी कृत्यांत सामील झालेले सर्वजण उच्चशिक्षित, सुखवस्तू कुटुंबातील तरुण होते. ‘इसिस’मध्ये दाखल होण्यासाठी युरोप व जगाच्या इतर भागांतील देशांतून गेलेले तरुण-तरुणीही बहुतांश शिक्षित व सुखवस्तू कुटुंबातील होते. एवढेच कशाला मुंबईनजीकच्या कल्याण येथून जे चार तरुण इराक-सीरियात गेल्याचे प्रथम गेल्या वर्षी जाहीर झाले, तेही अभियांत्रिकी वा तत्सम अभ्यासक्रम पुरे केलेले आणि सधन कुटुंबातीलच होते. ही सगळी उजळणी करण्यामागचा उद्देश एकच आहे आणि तो म्हणजे ‘दहशतवाद’ म्हटला की तो ‘इस्लामी’ आणि तसा तो मानला की, मग ‘अशिक्षित, धर्मवेडे’ अशी जी प्रतिमा जनमनावर ठसली गेली आहे, तिचा वास्तवाशी संबंध नाही. खरा मुद्दा आहे, तो असे शिक्षित तरुण-तरुणी कट्टरवादी कसे बनतात हाच. ज्या १३ जणांना ‘एनआयए’ने ताब्यात घेतले आहे, ते इंटरनेटच्या माध्यमातून काही कट्टरवादी व्यक्ती व गटांशी संवाद साधून होते. या संवादातूनच ते कट्टरवादाकडे आकर्षित झाले. असे घडण्याची दोन प्रमुख कारणे आहेत. त्यातील पहिले कारण आहे, ते अन्यायाच्या भावनेचे. उदाहरणार्थ, एखादा चांगला शिक्षित मुस्लीम तरुण वा तरुणी माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील प्रथितयश कंपनीत चांगल्या पगारावर नोकरीला लागते. सुखी-समाधानी व प्रतिष्ठेचे आयुष्य जगावे, अशी त्या तरुणाची वा तरुणीची आकांक्षा असते. गरीब व कनिष्ठ वर्गातून आलेल्या या तरुणाच्या पगारामुळे कुटुंबात प्रथमच थोडी सुबत्ता येते. चांगल्या घरात राहण्याची इच्छा निर्माण होते. इतका पगार असल्याने बँकेचे कर्ज घेण्याची ऐपतही निर्माण झालेली असते. पण ‘चांगली व प्रतिष्ठित’ घरे असलेल्या लोकवस्तीत मुस्लीम असल्यास जागा मिळत नाही. तेव्हा प्रथम अन्याय होत असल्याची भावना रुजते. असे अनुभव वारंवार येत गेले की ही भावना प्रबळ होत जाते. अशावेळीच ‘इंटरनेट’च्या माध्यमातून जगाच्या कोठल्या तरी कोपऱ्यात बसून प्रक्षोभक व विखारी प्रचार करणारी माहिती, छायाचित्रे, व्हिडीओ वगैरे ‘इंटरनेट’वर काही गटांतर्फे टाकले जात असतात. अन्यायाची भावना प्रबळ होत असलेल्यांना ते आकर्षित करतात आणि हे तरुण कट्टरवादाच्या आहारी जातात. दुसरे कारण आहे, ते प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या हडेलहप्पीचे. एखादा दहशतवादी हल्ला झाला की, बहुतांश मुस्लीम वस्ती असलेल्या भागांतून तरुणांना ताब्यात घेतले जाते. अशा कारवाईत असंख्य निरपराध भरडले जातात. मग ते अशा प्रक्षोभक व विखारी प्रचाराला सहज बळी पडतात. अर्थात याचा अर्थ मुस्लीम समाजाचे काहीच चुकत नाही, असा नाही. इस्लाममध्येही अनेक प्रकारच्या सुधारणा केल्या जाणे आवश्यक आहे. पण अशा प्रकारच्या सुधारणा करण्यात नेहमी मध्यमवर्गच आघाडीवर असतो, असा इतिहासाचा दाखला आहे. मुस्लीम समाजात आर्थिक विकासाच्या ओघात मध्यमवर्ग निश्चितच आकाराला येत गेला आहे. धर्माच्या बंदिस्त स्वरूपामुळे त्याचा श्वास कोंडला जात आहे. त्याला या बंदिस्त धर्माची कवाडे उघडून स्वातंत्र्याचा वारा आपल्या समाजात आणायचा आहे. पण जेव्हा असा मध्यमवर्ग ही कवाडे उघडायचा प्रयत्न करतो, तेव्हा बाहेर त्याचे स्वागत होण्याऐवजी बहुतेकदा त्याला आक्रमकतेलाच तोंड देण्याची पाळी येते. त्यामुळे तो पुन्हा धर्माच्या बंदिस्त स्वरूपातच अडकवला जातो. त्यामुळे अन्यायाची भावना अधिकच तीव्र होते. ही प्रक्रिया समजून घेऊन सावधानतेला संयमाचीही जोड दिली गेली पाहिजे. अंतिमत: ‘दहशतवाद’ - मग तो कोणत्याही रंगाचा असो - हा राजकीय उपायांमुळेच आटोक्यात येतो, हे जगभर सिद्ध झाले आहे. सुरक्षा उपाय हे तात्पुरता धोका निवारण्यापुरते उपयोगी पडत असतात, हेही भान ठेवले जाणे गरजेचे आहे.
गरज सावधानतेची, तशीच संयमाचीही!
By admin | Updated: January 25, 2016 02:17 IST