चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी नुसती जारी होणे उपयोगाचे नाही. तशी ती वर्धा आणि गडचिरोली या विदर्भातील दोन जिल्ह्यांतही लागू आहे. राज्य पातळीवर ती गुजरातमध्ये आहे आणि आता केरळमध्ये येऊ घातली आहे. परंतु ज्या भागात दारुबंदी आहे त्या सगळ््या भागात दारु उपलब्ध आहे आणि हवी तेव्हा हवी तेवढी मिळू शकणारी आहे. दारुचे विक्रेते ही एक हुशार जमात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी होऊ नये अशी मागणी करणारा २० हजार लोकांचा एक मोर्चा त्यांनीही विधानसभेवर आणला होता. देशी व विदेशी दारुची दुकाने, मद्यालये आणि त्याखेरीज दारुचा अवैध व्यापार करणारे लोक त्यांच्या कुटुंबियांसह या मोर्चात सामील होते. त्यांना आणण्या-नेण्याचा व त्यांच्या राहण्या-खाण्याचा सगळा खर्च अर्थातच त्यांच्या मालकांनी केला होता. हे मालक राजकारणात वजनदार आहेत, त्यांच्या शाळा आहेत, महाविद्यालये आहेत, मंत्र्यांसोबतच्या बैठकी आहेत आणि त्यातले काही नगराध्यक्ष तर काही पक्षातले पदाधिकारी आहेत. एवढ्या सगळ््यांचे वजन झुगारून चंद्रपुरात दारूबंदी झाली असेल तर ती करणाऱ्यांचे अभिनंदन केले पाहिजे आणि ती घडवून आणणाऱ्या त्या जिल्ह्यातील शूर महिलांचे कौतुक केले पाहिजे. १ एप्रिलला ही बंदी लागू होईल आणि त्यापुढे तिचे खरे प्रश्न समोर येतील. दारुबंदीची घोषणा होताच चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवरील जमिनींचे भाव अस्मानाला भिडले. घुघ्घुस, राजुरा आणि वर्धा नदीच्या किनाऱ्यावरील शेत जमिनी एका रात्रीतून २० ते २५ लाख रुपये एकर किंमतीच्या झाल्या. या जमिनीवर आता जिल्ह्यातली उठलेली दुकाने लागतील आणि तेथून दारूचा घरपोच व्यवहारही सुरू होईल. वर्धा जिल्ह्यात हे झाले. गडचिरोलीतही ते झाले आहे. दारूबंदीची मागणी करणारी माणसे तिच्या बंदीच्या घोषणेने समाधानी होतात. मात्र तिच्या अंमलबजावणीसाठी जो सावध आग्रह धरायचा तो ती धरीत नाहीत. परिणामी दारुचा चोरटा व्यवहार वाढतो आणि त्यात सारेच जण आपापले हात धुवून घेतात. ज्यांच्याजवळ जास्तीचा पैसा नाही ती दारुबाज माणसे घरात दारू गाळण्याचा उद्योग करतात आणि घरच्या साऱ्यांना तो मुकाट्याने पाहण्याखेरीज पर्याय नसतो. ज्या गोष्टी बंद होत नाहीत (व होऊही शकत नाहीत) त्यांच्या अशा मागणीलाच फारसा अर्थ नसतो. दारुबंदीचे प्रयोग याआधी अमेरिकेत झाले, फ्रान्समध्ये झाले. पण तेथेही ते अपयशी ठरले. अखेर ज्यांनी ती बंदी आणली त्यांनाच ती नाईलाजाने उठवावी लागली. दारू वाईट हे सारेच म्हणतात पण दारूची तरफदारी करणारी माणसेही जगात फार झाली आणि ती मोठीही होती. अगदी सॉक्रेटिस-अॅरिस्टॉटलपासून आपल्या वेदातील ऋषीमुनींपर्यंतचे सारेच ते अपेयपान हौसेने करीत. अमेरिकेत दारू बंदी असताना त्या देशाला भेटीला गेलेले आईनस्टाईन जाहीरपणे म्हणाले, ‘तुमच्या देशात सारे चांगले आहे फक्त ती दारूबंदी वाईट आहे’ दारु वाईट असते की ती पिऊन धुंद होणारा माणूस वाईट असतो यावर वाद आहे आणि त्यावर काव्येही आहेत. याहून यातनादायक पण मजेशीर कहाणी फ्रान्सने लागू केलेल्या वेश्याबंदीची आहे. त्या बंदीसाठी फ्रान्समधील सज्जन स्त्रियांनी मोर्चे काढले. पण त्या बंदीनंतर ‘जगातला तो सर्वात जुना व्यवसाय’ सभ्य वस्त्यांमध्येच सुरू झाल्याचे अनुभवाला आले. परिणामी ज्या स्त्रियांनी त्यावर बंदी घालण्याची मागणी केली त्यांनीच मग ती उठवण्याचे साकडे सरकारला घातले. मानवी स्वभावाचे पुरते आकलन अद्याप व्हायचे राहिले आहे आणि ते शास्त्रीय पातळीवर जोवर होत नाही तोवर असे अनुभव समाजाला घ्यावे लागणार आहेत. दारु पिणारी सगळी माणसे वाईट आणि ती न पिणारी सारी एकजात सज्जन असे म्हणता येत नाही. देश वाचविणारे, महायुद्धे जिंकणारे आणि जगाने शिरोधार्ह मानलेले महान दारुबाज जगाला ठाऊक आहेत. तसे ती न पिता नुसतेच बसून समाज बुडविणारे लोकही जगाच्या परिचयाचे आहेत. तरीही दारुबंदीची मागणी करणारी काही चांगली माणसे महाराष्ट्रात आहेत. या मागणीला पाठिंबा देणाऱ्या स्त्रियांची संख्याही मोठी आहे. विशेषत: ग्रामीण भागातील कष्टकरी स्त्रियांच्या वाट्याला येणारे दारुचे दुष्परिणाम मोठे आहेत. ‘दारुपायी नवराच नव्हे तर मुलगा आणि नातूही आमच्यावर हात टाकतो’ असे रडून सांगणाऱ्या स्त्रियांचा एक मोठा वर्ग चंद्रपूर जिल्ह्यातील मूलपासून नागपूरपर्यंतचे दिडशे कि.मी.चे अंतर पायी चालून विधानसभेवर चालून आला होता. घरे धुवून निघाली, मुले रस्त्यावर आली आणि घरात खायला काही उरले नाही अशा कहाण्या त्या सांगत होत्या. यवतमाळ, चंद्रपूर यासारख्या विदर्भाच्या पूर्व भागात अशा दारिद्र्यापायी मृत्यू जवळ करणाऱ्यांची गणना कधीतरी होणे आवश्यक आहे. पुण्या-मुंबईकडील अनेक सभ्य व श्रीमंत कुटुंबात दारु हा दिवाणखान्यात आलेला आदरणीय पदार्थ बनला आहे. मात्र त्याच वेळी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात तो एका मोठ्या समाजाला भेडसावणारा विषाक्त विषयही आहे. गावोगावी त्याचसाठी महिलांचे मतदान होताना आपण आता पाहत आहोत. चंद्रपूरची मागणी या स्थितीत संतापलेल्या स्त्रियांच्या आक्रोशातून आली आहे. हा आक्रोश वाया जाता कामा नये. समाज सुसंस्कृत झाल्यानंतरची गोष्ट वेगळी. आता मात्र या स्त्रियांच्या बाजूने समाजाने एकजुटीने उभे राहणे आवश्यक आहे.
दारुबंदी आली, आता पुढे....
By admin | Updated: January 31, 2015 04:42 IST