कडा: आष्टी तालुक्यातील अनेक गावातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहे. अनेक टँकरमधून पाण्याची गळती होत असल्याने हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचे दिसून येत आहे.आष्टी तालुक्यात सध्या पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. तालुक्यातील तब्बल ६३ गावांना व १०७ वाड्यांना ८० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यातील तब्बल १ लाख ७७ लोकांची तहान टँकरद्वारे भागविली जात असल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले. यासाठी टँकरच्या दररोज २०० खेपा केल्या जात आहेत. तालुक्यात मोठ्या प्रमाणावर टँकर सुरू असून अनेक टँकरच्या टाक्यांना छिद्र पडलेले आहेत. एकीकडे ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी महिला, ज्येष्ठ नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. तर टँकरमधून हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त होत आहे. टँकरमधून वाया जाणाऱ्या पाण्याकडे प्रशासनासह संबंधित टँकर चालकाचे लक्ष नसल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. हा पाण्याचा अपव्यय थांबविण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते दादा जगताप यांनी केली आहे. टँकरमधून होणाऱ्या पाण्याच्या गळतीसंदर्भात आष्टी पं.स.चे गटविकास अधिकारी उद्धव सानप म्हणाले की, पाणी गळती होणाऱ्या टँकरची तात्काळ दुरूस्ती करण्यात येईल व पाण्याचा अपव्यय थांबविण्यात येईल. (वार्ताहर)
टँकरमधून पाण्याची गळती
By admin | Updated: June 19, 2014 00:16 IST