औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून अभियांत्रिकीचे पेपर तपासणीत झालेल्या चुका दुरुस्त करून विद्यार्थ्यांना न्याय देण्यास दिरंगाई होत असल्याचे समोर आले आहे. परिणामी, निकालाची वाट बघत अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागली आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने गेल्यावर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये घेतलेल्या अभियांत्रिकीच्या परीक्षांचा निकाल मार्च-एप्रिलमध्ये जाहीर झाला. ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित गुण मिळाले नाहीत, त्यांनी विद्यापीठाकडे रिड्रेसल अर्ज (पुनर्मूल्यांकन) सादर केले. औरंगाबाद कॉलेज आॅफ इंजिनिअरिंगमध्ये शिकत असलेल्या मयूर श्रीनिवास याला त्याने सोडविलेल्या प्रश्नाच्या उत्तराला गुण न दिल्याचे तसेच त्याने ज्या प्रश्नाचे उत्तर लिहिले नाही त्याला गुण देण्यात आल्याचे समोर आले होते. परिणामी, तो इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड या विषयात नापास झाला. एव्हरेस्ट इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग पदवी अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी सय्यद इद्रीस अहेमद याची उत्तरपत्रिका तपासतानाही चुका झाल्या आहेत. त्याची उत्तरपत्रिका अर्धवट तपासण्यात आली. त्यामुळे तो नापास झाला. या दोन्ही विद्यार्थ्यांनी रिड्रेसलसाठी अर्ज केल्यानंतर झालेल्या चुका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्या. रिड्रेसलचा निकाल परीक्षा सुरू होण्यापूर्वी जाहीर होणे अपेक्षित असते. विद्यार्थ्यांच्या अर्जावर निर्णय घेण्यास विद्यापीठ परीक्षा विभागाकडून दिरंगाई झाली. परिणामी, त्या विद्यार्थ्यांना २ जूनपासून सुरू झालेली परीक्षा द्यावी लागली. रिड्रेसलचा निकाल दोन महिन्यांत लावणे विद्यापीठांना बंधनकारक आहे. विद्यापीठाने घाईघाईने रिड्रेसलचा निकाल घोषित केल्याने विद्यार्थ्यांवर अन्याय झाला आहे. सकारात्मक विचारयाविषयी परीक्षा विभागातील विशेष कार्य अधिकारी डॉ. सूर्यकांत जगदाळे म्हणाले की, विद्यार्थ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्यामुळे त्यांचा सकारात्मक विचार करून त्या तक्रार निवारण समितीकडे पाठविण्यात आल्या आहेत.
इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना न्याय देण्यात विद्यापीठाकडून दिरंगाई
By admin | Updated: June 10, 2014 01:00 IST