जालना: शहरातील पथदिवे गेल्या दीड वर्षांपासून बंद असल्याने सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असून शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदिल लावण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी म्हटले आहे.अंबेकर यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, शहरात चोऱ्या, घरफोड्यांचे प्रमाण पथदिवे बंद असल्यामुळेच वाढले आहे. महिला व तरूण मुलींना रात्री घराबाहेर पडण्यास भीती वाटते. बस-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रात्री-अपरात्री शहरात आल्यानंतर अंधाराचा गैरफायदा घेऊन लुटण्याचे प्रकार घडत आहेत. शहर अंधारात असताना पालिकेला मिळालेल्या आयएसओ प्रमाणपत्राबद्दलही अंबेकर यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. गेल्या दीड वर्षात सर्वधर्मियांनी आपापले सण, उत्सव समारंभ अंधारातच साजरे केले आहेत. शिवसेनेने यापूर्वी मुख्याधिकाऱ्यांना कंदील भेट देऊन शहरातील अंधाराच्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र हा प्रश्न अद्याप सुटलेला नाही. चौकाचौकात हायमास्ट दिवे लावून पैशाचा अपव्यय केला जात असल्याचा आरोपही अंबेकर यांनी केला आहे. हे हायमास्ट दिवे उभारण्याऐवजी वीज वितरण कंपनीचे वीज बिल भरून सर्व पथदिवे सुरू करावेत. या मागणीकडे लक्ष देऊन चार दिवसांत पथदिवे सुरू न केल्यास शिवसेनेच्या वतीने विद्युत खांबांवर कंदील लावून आंदोलन केले जाणार असल्याचेही नमूद केले.
शहरातील विद्युत खांबांवर शिवसेना लावणार कंदिल
By admin | Updated: June 9, 2014 00:11 IST