औरंगाबाद : जायकवाडी धरणातून रबी पिकांसाठी दोन आवर्तने देण्याचे जलसंपदा विभागाने जाहीर केले होते; परंतु गोदावरीवरील बंधाऱ्यांमध्ये पाणी सोडावे लागल्यामुळे आणि परळी थर्मलसाठी पाणी द्यावे लागणार असल्यामुळे आता शेतीसाठी दुसरे आवर्तन मिळण्याची शक्यता कमी झाली आहे. जुलैपर्यंतची गरज भागवून धरणाच्या उपयुक्त साठ्यात केवळ ७० दलघमी पाणीच शिल्लक राहणार आहे, तर दुसऱ्या आवर्तनासाठी किमान ११० दलघमी पाणी लागणार आहे. त्यामुळे वरच्या भागातील धरणांमधून पाणी आले तरच शेतीला दुसरे आवर्तन मिळू शकेल, असे कडाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जायकवाडी धरणामुळे औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यांतील सुमारे १ लाख ८३ हजार हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यंदा जायकवाडी धरणात पावसाळ्याच्या शेवटी ४४ टक्के पाणीसाठा झाला होता. त्यामुळे जलसंपदा विभागाने जायकवाडीतून रबी हंगामासाठी दोन पाणी पाळ्या (आवर्तन) देण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार नोव्हेंबर महिन्यात पहिले आवर्तन देण्यात आले. दरम्यान, आपेगाव आणि हिरडपुरी बंधाऱ्यांत नागरिकांच्या मागणीनुसार १५ दलघमी पाणी सोडावे लागले. याशिवाय आगामी काळात परळी थर्मललाही पाणी देण्याची गरज भासणार आहे. जायकवाडीत आजघडीला २८.४१ टक्के म्हणजे ६१६ दलघमी पाणी आहे. जुलै २०१५ पर्यंतची पिण्याच्या पाण्याची गरज, औद्योगिक पाणी वापर आणि होणारे बाष्पीभवन यासाठी ४८० दलघमी पाणी लागणार आहे. यंदा माजलगाव धरणात पाणी राहिलेले नाही.
रबीसाठीचे दुसरे आवर्तन अडचणीत
By admin | Updated: December 1, 2014 01:27 IST