हणमंत गायकवाड , लातूरलातूर जिल्ह्यात परवानाधारकांची सावकारी जोरात चालू असून, व्यापार-उद्योगाच्या नावावर शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे. परिणामी, या सावकारांचा फास जिल्ह्यातील ७ हजार २२६ शेतकऱ्यांपुढे आहे. चालू आर्थिक वर्षात ११ कोटी ८५ लाख १६ हजार रुपये कर्जाचा डोंगर या शेतकऱ्यांवर आहे. त्याचे व्याज भरता भरता नाकी नऊ येत असून, ६१७ अधिकृत सावकारांबरोबर जिल्ह्यात हजारो अनाधिकृत सावकारांचीही ‘सावकारी’ राजरोसपणे सुरू आहे. इकडे शासनाला महसूल मिळतो म्हणून प्रशासनही ‘चिडीचूप’ आहे.लातूर जिल्ह्यातील दहाही तालुक्यांत अधिकृत आणि अनाधिकृत सावकारी बोकाळलेली आहे. ६१७ परवानाधारक तर हजारो विनापरवानाधारक सावकारांचा कर्जाचा व्यवहार सुरू आहे. या सावकारांनी व्यापार, उद्योगांच्या नावावर शेतकऱ्यांनाच कर्ज दिले आहे. लातूर तालुक्यात २४५ सावकारांनी २४९३ जणांना २ कोटी ७३ लाख ६२ हजारांचे कर्ज वितरीत केले आहे. औसा तालुक्यात ५४ सावकारांनी ८९ शेतकऱ्यांना ६.५ लाखांचे, निलंगा तालुक्यात ६५ सावकारांनी १८५३ जणांना ३ कोटी ४० लाख १६ हजार, उदगीर तालुक्यात १११ सावकारांनी ११५० जणांना ५ कोटी १९ लाख, अहमदपूर तालुक्यात २१ सावकारांनी १२१ जणांना १३.५ लाख, चाकूर तालुक्यात ५४ सावकारांनी ८२ जणांना ९.९५ लाख, रेणापूर तालुक्यात २५ सावकारांनी १२४ जणांना ५.१४ लाख, जळकोट तालुक्यात ६ सावकारांनी २७ जणांना ७३ हजारांचे आणि शिरूर अनंतपाळ तालुक्यात १९ सावकारांनी १२८७ जणांना १६.५६ लाखांचे कर्ज वितरीत केले आहे. सदरचे कर्ज शेतकऱ्यांना वितरीत करता येत नाही. उद्योग-व्यापारासाठीच देण्यात यावे, असा नियम आहे. परंतु, कर्ज वितरीत केलेल्या लाभधारकांमध्ये ९९.५ टक्के कर्जदार शेतकरीच आहेत. मात्र त्यांना कर्ज शेतीच्या नावाऐवजी व्यापार-उद्योगाच्या नावावर देण्यात आले आहे. ४परवान्याच्या नूतनीकरणापोटी कमीत कमी ५०० रुपये आणि जास्तीत जास्त ५० हजार रुपये शासनाला परवानाधारक सावकारांकडून महसूल मिळतो. शिवाय, सावकारांच्या उलाढालीवरून १ टक्का रक्कम शासनाला मिळते. या महसुलापोटी नियमांचे उल्लंघन होत असावे, म्हणूनच व्यापार-उद्योगांच्या नावावर शेतकऱ्यांना कर्ज वितरीत होते. १ जानेवारी ते ३१ सप्टेंबर २०१४ या कालावधीत लातुरातील सावकारांकडून ५ लाख ७९ हजार ४५१ रुपयांचा महसूल शासनाला मिळाला आहे. या महसुलापोटीच प्रशासन ‘चिडीचूप’ असल्याचे बोलले जाते. ४परवान्याचे नूतनीकरण आणि उलाढालीवरून आकारण्यात आलेले ५ लाख ७९ हजार ४५१ रुपयांचे शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहे. लातूर तालुक्यातून २ लाख ४७ हजार ७६२, चाकूर तालुक्यातून ६४ हजार ६९९, औसा तालुक्यातून ५९ हजार ५५४, शिरूर अनंतपाळ तालुक्यातून २१ हजार ३७६, रेणापूर तालुक्यातून २६ हजार ५००, अहमदपूर तालुक्यातून २७ हजार २७५, निलंगा तालुक्यातून १ लाख ४०७५ आणि देवणी तालुक्यातून ४८ हजार ७१० रुपये मिळाले आहेत. ४अवैध सावकारीबाबत मागील महिन्यात ९५ तक्रारी प्राप्त झाल्या असून, चालू महिन्यात चार तक्रारी दाखल झाल्या आहेत. एकूण ९९ तक्रारी आहेत. या ९९ अनाधिकृत सावकारांचीही सावकारी जोरात आहे. या तक्रारींच्या अनुषंगाने जिल्हा उपनिबंधकांकडे सुनावणी झाली असता २७ जणांवर कारवाई करून त्यांना समज देण्यात आली आहे. मात्र त्यांच्यावर कुठल्याही प्रकारची फौजदारी कारवाई करण्यात आली नाही. तक्रारी आल्याशिवाय कारवाई नसल्याने अनाधिकृत सावकारीही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बोकाळली आहे.
सावकारीचा ७ हजार शेतकऱ्यांपुढे फास !
By admin | Updated: December 19, 2014 00:58 IST