उस्मानाबाद : सध्या जिल्ह्यामध्ये भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चाऱ्यासोबतच पाण्याचेही दुर्भीक्ष्य निर्माण झाले आहे. जिल्हाभरात उद्भवलेली चाराटंचाई लक्षात घेऊन ५१ छावण्यांना मंजूरी दिली आहे. यापैकी १६ छावण्या सुरू झाल्या आहेत. छावण्या चालकांकडून व्यवस्थितरित्या सोयी-सुविधा ुपुरविल्या जातात की नाही? हे पाहण्यासाठी त्या-त्या भागातील सरपंचांनीही चारा छावण्यांना भेटी द्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले. शहरातील जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावर लोकमाहिती अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मंगळवारी झाले. याप्रसंगी ते बोलत होते. मंचावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद रायते, टाटा सामाजिक संस्थेचे डॉ. अब्दुल शाबान, पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले यांची प्रमुख उपस्थिती होती. दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने शासन विविध उपाययोजना करीत आहे. यासाठी विविध योजना सुरूही केल्या आहेत. या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, यासाठी जनजागृती आवश्यक आहे. अशा लोकमाहिती अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होते, असे डॉ. नारनवरे यांनी नमूद केले. सरपंच शासनाचे प्रतिनिधी आहेत. त्यामुळे सरपंचांनी पंचसूत्रीची (जलयुक्त शिवार, चारा, पाणी, हाताला काम, घरापर्यंत धान्य पोहोचविणे) काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. सध्या पाण्यासोबतच चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांची उपासमार होऊ नये, यासाठी ५१ छावण्यांना मंजुरी दिली आहे. यापैकी १६ छावण्या सुरू झाल्या आहेत. या छावण्यातून शासन निकषानुसार सुविधा पुरविणे बंधनकारक आहे. छावण्या चालकांकडून हे निकष पाळले जातात की नाही, हे पाहणे गरजेचे आहे. यासाठी सरपंचांनीही छावण्यांना भेटी देऊन निकषांची पूर्तता होते की नाही? हे पाहिले पाहिजे. निकषांची पूर्तता होत नसेल तर प्रशासनाला कल्पना द्या, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी रायते यांनीही मार्गदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचविल्या जातील, असे सांगत, टंचाई निवारणार्थ सुरू केलेल्या योजना पूर्ण क्षमतेने राबवू, असे ते म्हणाले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक अभिषेक त्रिमुखे यांनीही मनोगत व्यक्त केले. शासनाच्या योजनांची जनजागृती झाल्याशिवाय त्याचा सर्वसामान्यांना लाभ होणार नाही, त्यामुळे लोकमाहिती अभियानासारखे कार्यक्रम अधिकाधिक प्रमाणात व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यावेळी इतर मान्यवरांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
चारा छावण्यांना सरपंचांनी भेटी द्याव्यात
By admin | Updated: December 9, 2015 00:40 IST