बापू सोळुंके
औरंगाबाद : इंधन दरवाढीमुळे नागरिकांचा स्वतंत्र वाहन वापरण्याऐवजी रिक्षा वापरण्याकडे कल दिसून येत असला तरी रिक्षात मीटरने प्रवास करायचा झाल्यास मीटरच बंद असल्याचे दिसून येते. शहरात आणि ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करण्यासाठी देण्यात आलेल्या परवानाधारक ७० ते ८० टक्के रिक्षांचे मीटर बंद पडले आहेत. उर्वरित रिक्षांचे मीटर गायब झाले आहेत.
औरंगाबाद शहरात प्रवासी वाहतूक करण्यासाठी २५ हजार परवानाधारक रिक्षा आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅसवर या रिक्षा चालतात. वर्षभरापासून या सर्व इंधनाचे दर सतत वाढत आहेत. इंधनाचे दर आणि महागाईनुसार शासनाकडून रिक्षाच्या मीटरचे भाडे ठरवून देण्यात येते. मात्र, सात ते आठ वर्षांपासून रिक्षा प्रवास भाडे दर निश्चित करण्यासाठी परिवहन आयुक्तांना वेळच मिळाला नाही. परिणामी रिक्षाचालकांनी इलेक्ट्रॉनिक मीटरऐवजी ठरावीक दराने प्रवासी वाहतूक करण्यास सुरुवात केली.
परवानाधारक रिक्षाचे दरवर्षी आरटीओ अधिकाऱ्यामार्फत परीक्षण करून फिटनेस प्रमाणपत्र घेणे रिक्षामालकास बंधनकारक आहे. चालू स्थितीत मीटर असल्याशिवाय आरटीओ अधिकारी रिक्षाची पासिंग (परवाना) करीत नाही. ही बाब लक्षात घेऊन आरटीओकडे रिक्षा पासिंगसाठी नेण्यापूर्वी मीटर सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतात. वर्षभर मीटरनुसार एकाही प्रवाशाला भाडे न आकारणारे रिक्षाचालक मीटर चालू स्थितीत आणण्यासाठी मेकॅनिककडे चारशे ते पाचशे रुपये खर्च करतात. रिक्षाची पासिंग होताच बहुतेक रिक्षाचालक मीटर काढून ठेवतात. ही बाब आरटीओ अधिकाऱ्यांनाही माहिती आहे. असे असले तरी दरपत्रक निश्चित न झाल्यामुळे आरटीओ प्रशासनही रिक्षाचालकांना मीटरवर प्रवासी वाहतूक करण्यासाठी बंधन घालत नाही.
–-----–------------------
चौकट
मीटर बंद असल्याचे येते उत्तर
एखादा प्रवासी मीटरनुसार प्रवास भाडे आकारायला सांगतो तेव्हा रिक्षाचालक मीटर बंद असल्याचे उत्तर देतो. परिणामी प्रवाशाला रिक्षाचालक सांगेल तेवढे पैसे मोजून प्रवास करावा लागतो.