जालना : शहरात शनिवारी जवळपास एटीएम बंद असल्याने पैसे काढण्यासाठी गेलेल्या अनेक नागरिकांची निराशा झाली. शनिवार हा बँकांच्या कामकाजाचा अर्धा दिवस असल्याने व रविवारी सुटी असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणीला सामोरे जावे लागले. विविध बँकांचे शहरात सुमारे ३५ ते ४० एटीएम केंद्रे आहेत. बँकांमध्ये रांगेत उभे राहून पैसे काढण्यापेक्षा एटीएमवर जाऊन दोन मिनिटात पैसे काढण्यावर अनेकांचा भर असतो. परंतु एटीएमवर पैसे न मिळाल्यास नागरिकांना बँकेत जाण्याशिवाय पर्याय नसतो. अशा परिस्थितीत शनिवारी दुपारी १२ नंतर शहरातील जवळपास एटीएम बंद होते. शिवाजीपुतळा परिसरात चार, मामा चौक व महावीर चौक परिसरात एकूण पाच, भोकरदन नाका परिसरात चार, गांधीचमन भागात चार, शनिमंदिर व कचेरी रोड भागात तीन आणि इतरही ठिकाणी बरेच एटीएम बंद होते. यापैकी काही ठिकाणी तेथील सुरक्षारक्षकांनी पैसे संपल्याने एटीएम बंद असल्याचे सांगितले. तर काही ठिकाणी नादुरूस्तीमुळे बंद असल्याचे सांगण्यात आले. पैसे काढण्यासाठी नागरिक प्रत्येक भागातील एटीएम केंद्रांचा शोध घेत होते. परंतु या सर्व ठिकाणी त्यांची निराशा होत होती. विशेषत: ज्यांना रुग्णालय, औषधी किंवा यासारख्याच अत्यावश्यक सेवेसाठी पैसे लागतात, त्यांची मोठी गैरसोय झाली. दिवसभर एटीएम बंदमुळे त्रस्त झालेल्या काही नागरिकांनी संतापही व्यक्त केला.
जालन्यातील एटीएममध्ये खडखडाट..!
By admin | Updated: January 11, 2015 00:55 IST